निगडी – पिंपरी चिंचवड शहर प्रशस्त रस्त्यांसाठी प्रसिद्ध आहे. मोठे रस्ते, आवश्यकतेनुसार उड्डाणपूल तसेच चौक असताना देखील वाहतूक विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे आज उद्योगनगरीतील नागरिकांना कोणत्याही भागात गेले तरी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. निगडी येथील लोकमान्य टिळक चौकाला रिक्षाचालकांनी विळखा घातला असून प्रशासन बघ्याची भूमिका घेत आहे. बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत.
निगडी येथील लोकमान्य टिळक चौकात दिवसरात्र नागरिक व वाहनचालकांची मोठी वर्दळ असते. कै. मधुकरराव पवळे उड्डाणपुलाशेजारी पीएमपीचा बस थांबा आहे. या भागातून पिंपरी चिंचवड शहरातील विविध उपनगरांमध्ये तसेच पुणे व परिसरात ये-जा करण्यासाठी पीएमपी मिळते. त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणावर येथे गर्दी असते. या गर्दीतील नागरिक आपला ग्राहक आहे आणि तो मिळविण्यासाठी रिक्षाचालक या चौकात दिवसरात्र घिरट्या घालत असतात. परंतु रिक्षाचालक हे करत असताना नियमांची पायमल्ली करत आहेत. याकडे वाहतूक विभागाचे मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष होत असल्याने सर्वसामान्य नागरिक व वाहनचालक यांना त्रास सहन करावा लागत आहे.
नियमांची होतेय पायमल्ली
निगडी, पिंपरी, साने चौक, चिखली, भोसरी आदी परिसरातील महत्त्वाच्या चौकांमध्ये बेशिस्त रिक्षाचालक दिसून येत आहेत. भर रस्त्यात रिक्षा पार्क करून वाहतूक कोंडी करण्याचे काम केले जाते. परंतु चौकातील वाहतूक नियंत्रण करणारे पोलीस व वॉर्डन त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये प्रशासनाविषयी रोष निर्माण होत आहे. निगडी येथे पहाटे बाहेरच्या राज्यातून व जिल्ह्यांमधून आलेल्या ट्रॅव्हल्समधील प्रवासी मिळविण्यासाठी रिक्षाचालकांची बेशिस्तपणे धावपळ सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे.
बेशिस्त रिक्षाचालकांमुळे अपघात
शुक्रवारी पहाटे सहा वाजता एक ऑटो रिक्षा निगडी चौकात विरुद्ध दिशेने प्रवास करत होती. ती रिक्षा समोरून येणाऱ्या दुचाकीला धडकली. त्यामुळे दोघांमध्ये बराच वेळ बाचाबाची झाली. शिवाय वाहतूक ठप्प झाली. परंतु वाहतूक विभाग अशा बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई करताना दिसून येत नाही. राजरोसपणे असे प्रकार पिंपरी चिंचवड शहरात घडत असल्याने त्यांच्यावर पोलीस कारवाई का करत नाही हा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे.
बेशिस्त रिक्षाचालकांमुळे प्रवाशांना मार्ग काढताना तारेवरची कसरत करावी लागते. पहाटे निगडी येथे आल्यावर पीएमपी नसते. त्यामुळे रिक्षा करून निश्चित स्थळी जावे लागते. शहरातील सर्वच बस स्थानक, रेल्वे स्थानकांच्या परिसरांत ही स्थिती आहे. त्यामुळे शहरातील बहुतांश चौकांमध्ये रिक्षाचालकांचे अतिक्रमण दिसून येत आहे. रिक्षावाल्यांच्या रस्त्यावरील अरेरावी उद्योगास वेळीच चाप लावणे गरजेचे आहे.
– शिवानंद चौगुले, नागरिक.