चिखली – पिंपरी चिंचवड महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांना साधारण वीस वर्षे होऊन गेली. परंतु महापालिका स्मार्ट होण्यासाठी आतोनात प्रयत्न करत आहे. शहरात मेट्रो, बीआरटी आदी प्रकल्प कार्यान्वीत झाले परंतु सर्वसामान्य नागरिकांचे मूलभूत प्रश्न मात्र अजूनही सुटताना दिसून येत नाहीत.
चिखली परिसरात एकही दिवस असा नाही की तेथे वीजपुरवठा खंडित होत नाही. चिखलीमधील रामदासनगर, कुदळवाडी, पाटीलनगर, मोरेवस्ती आदी भागात वीजपुरवठ्याचा सर्वांत मोठा प्रश्न आहे. पाटीलनगर परिसरात तर मागील काही दिवसांपूर्वी कित्येक दिवस वीजपुरवठाच खंडित होता. मोरेवस्तीमध्ये अष्टविनायक चौक परिसरात साधारण दररोज वीजपुरवठा खंडित होत आहे. याकडे महावितरण लक्ष देणार आहे की फक्त नागरिकांकडून वीजबिले वसूल करणार आहे, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक करत आहेत.
अधिकाऱ्यांची ठरलेली उत्तरे
आज केबल फॉल्ट झाली आहे. फिडर नादुरुस्त झाला आहे. केबल जळाली आहे. तर कधी विद्युत रोहित्राचा डिव गेला आहे. तर कधी रॉड तुटला आहे. अशी विविध कारणे महावितरणचे अधिकारी व कर्मचारी वीजपुरवठा खंडित झाला की देत असतात. मोरेवस्तीमध्ये तर महापालिका पाणीपुरवठा करणार असेल त्याच दिवशी वीजपुरवठा ना दुरुस्त होतो. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहे.
महावितरणने चिखली परिसरात विद्युत रोहित्रे वाढविली पाहिजेत. डीपीवरील अतिरिक्त लोड कमी करावा. पाटीलनगर, धर्मनाथनगरकडे जाणारी भूमिगत केबल बऱ्याच ठिकाणी रस्त्याचे काम करताना नादुरुस्त झाली आहे. ती बदलून द्यावी. तसेच चिखली भागात वीजपुरवठा खंडित झाला तर आठ ते नऊ तास सुरळीत होत नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांनी यावर कायमचा तोडगा काढणे गरजेचे आहे.
– जितेंद्र यादव, सामाजिक कार्यकर्ते.