मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते अनिल देशमुख यांना महाविकास आघाडी सरकारच्या काळात 100 कोटींच्या खंडणीप्रकरणी तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. त्यानंतर आता त्यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. “माझ्यावरही समझोता करण्यासाठी दबाव होता, पण मी नकार दिल्याने दुसऱ्याच दिवशी माझ्यावर धाड पडली,” असे अनिल देशमुख म्हणाले. सध्या त्यांच्या या विधानाची सर्वत्र चर्चा रंगली आहे.
अनिल देशमुख म्हणाले की, “आरोप केल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी माझ्याशी समझोता करण्याचा प्रयत्न केला. समझोतासाठी त्यांनी दबाव देखील टाकला होता. मात्र माझा यासाठी नकार होता. मी नकार दिल्यामुळे परमवीर सिंग यांना माझ्यावर खोटे आरोप करायला सांगण्यात आले. मी समझोता केला असता तर माझ्यावर कारवाई झाली नसती,” असा खुलासा अनिल देशमुखांनी केला आहे.
अनिल देशमुख यांच्या अटकेबाबत शरद पवार म्हणाले होते की, “अलीकडेच आमचे काही लोक सरकारमध्ये सामील झाले आहेत. आम्ही विकासासाठी गेलो असे ते ससंगत आहे. पण त्याला काही अर्थ नाही. त्यापैकी काही ईडीच्या चौकशीत होते. त्यातील काहींना तपासाला सामोरे जावे वाटले नाही. पण अनिल देशमुख यांच्यासारख्या काहींनी तुरुंगात जाणं पसंत केलं.”
अनिल देशमुख यांच्यावर कोणता आरोप होता?
दरम्यान, अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि माजी पोलीस निरिक्षक सचिन वाझे यांना 100 कोटी खंडणी गोळा करण्यास सांगितल्याचा आरोप आहे. परमबीर सिंह यांनी हे आरोप केले आहेत. या प्रकरणात गुन्हा दाखल करून सीबीआय चौकशीचे आदेश दिले. सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर ईडीने देखील या प्रकरणात कारवाईला सुरुवात केली. अनिल देशमुख यांच्यावर आपल्या पदाचा गैरवापर करून भ्रष्टाचार केल्याचा आणि बेनामी संपत्ती गोळा केल्याचा आरोप आहे.