पुणे – “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल स्वत: विचार करण्याची गरज आहे. शिखर बॅंकेचा त्यांनी उल्लेख केला. मी कधीही शिखर बॅंकेचा मेंबर नव्हतो. मी कर्ज कधी घेतले नव्हते. मी त्या संस्थेचा कधीच सदस्य नव्हतो. तेव्हा याबाबत बोलणे कितपत योग्य आहे? सिंचनाबाबत त्यांनी वक्तव्य केले. ते खरे नाही,’ अशा शब्दांत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आरोपावर उत्तर दिले.
मोदी यांनी भाजपच्या बुथ कार्यकर्त्यांना दृकश्राव्य पद्धतीने मार्गदर्शन केले. त्यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर तसेच महाराष्ट्रातील विविध घोटाळ्यांचा संदर्भ देत विरोधकांवर टीका केली. “शरद पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीवर तब्बल 70 हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप आहे. असे एकही क्षेत्र नाही. जिथे कॉंग्रेसने घोटाळा केला नसेल,’ असे वक्तव्य मोदी यांनी केले. त्यावर पवार यांनी पुण्यात एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधला.
तेव्हा ते म्हणाले, “पंतप्रधानांनी उल्लेख केलेले शिखर बॅंक हे प्रकरण न्यायालयात गेले आहे. माझा शिखर बॅंकेसोबत काही संबंध नाही, हे स्पष्ट झालेले आहे. सुप्रिया सुळे यांचे नाव घेतले. मात्र, त्यांचाही काहीही संबंध नाही, हे बहुतांश लोकांना माहिती आहे. परंतु, देशातील विरोधी पक्षाचे लोक एकत्र येतात, देशाच्या समस्येबाबत चर्चा करतात, ही गोष्ट काही लोकांना पटत नाही. त्यामुळे अशा पद्धतीचे विधाने केली जातात, यापेक्षा अधिक काही बोलण्याची आवश्यकता नाही.’