नवी दिल्ली – राष्ट्रीय पातळीवर भाजपविरोधात लढण्यासाठी विरोधकांची महाआघाडी बनवण्याच्या प्रयत्नांत मी सहभागी आहे. पण, पश्चिम बंगालमध्ये कॉंग्रेस आणि माकप हे पक्ष वेगळा सूर आळवत आहेत, अशी नाराजी त्या राज्याच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल कॉंग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी सोमवारी व्यक्त केली.
बंगालमध्ये सध्या पंचायत निवडणुकांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. त्यातून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. एका सभेत बोलताना ममतांनीही संभाव्य मित्रपक्ष कॉंग्रेस आणि माकपला लक्ष्य केले.
ते पक्ष बंगालमध्ये भाजपच्या साथीने कार्य करण्यास प्रयत्नशील आहेत. मात्र, बंगालमध्ये त्यांच्यातील अपवित्र संबंध मी तोडेन, असा इशारा ममतांनी दिला. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राष्ट्रीय पातळीवर विरोधकांचे ऐक्य घडवण्याच्या उद्देशातून नुकतीच पाटण्यात बैठक झाली. त्या बैठकीत ममता, कॉंग्रेस आणि माकपचे नेतेही सहभागी झाले होते.
या बैठकीवेळी कॉंग्रेस आणि आपचे सूर जुळले नसल्याचे दिसून आले. त्यामुळे ममतांनी हस्तक्षेप करत त्या दोन्ही पक्षांना नंतर चहा-बिस्कीटं घेऊन तोडगा काढण्याचे आवाहन केले. त्यावेळी सामंजस्याची भूमिका घेणाऱ्या ममतांनी आता स्वत:च विरोधकांची चिंता वाढवणारी टीका केली आहे.