नगर – जून महिना नुकताच सुरू झाला. जून उजाडला तसं मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली आहे. नगर जिल्ह्यात जोरदार तर शहरात पावसाच्या सरी बरसल्या. अकोले, शेवगाव, राहुरी, श्रीगोंदा परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यात मोठ्या प्रमाणात घरांचे तसेच पिकांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी तापमानात अचानक वाढ झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर उकाड्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत होता. सकाळी उन्हाचे चटके लागत होते. अचानक दुपारी बारा वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्याला सुरुवात झाली. वाऱ्यांचा प्रचंड वेग असल्यामुळे वाहन चालवणं तसंच रस्त्यावर थांबणं सुद्धा कठीण झाल होतं. या वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणावर धूळ उडाल्याने समोरासमोरील दृश्य दिसेनासे झाले होते. वादळी वाऱ्याबरोबर वीजांचाही कडकडाट सुरु होता. परिणामी नगरमध्ये वीज पुरवठा खंडित झाला होता.
पाथर्डी तालुक्यातील बीड हायवेवरील खंरवंडीरोडवरील टोलनाका दुपारी तीन वाजता अचानक आलेल्या चक्रीवादळाने भुईसपाट झाला. यात सुदैवाने कुठलीही जीवीतहानी झाली नाही. तसेच खरवंडी, कोरडगाव, फुंदेटाकळी, कोळसांगवी परीसरातील अनेक घरांचे पत्रे उडाले असून फळबागांचे नुकसान झाले. तर शेवगाव तालुक्यातील अनेक गावांत वादळ वाऱ्याने धुमाकूळ घातला. पूर्व भागातील, घोटण, आंतरवाली, खानापूर, कऱ्हे टाकळी तसेच शेवगाव, जोहरापूर भागात झाडे उन्मळून पडली.
अकोल्यात वीज पडून एकाचा मृत्यू
अकोले तालुक्यातील म्हाळादेवी येथे वीज पडून रामदास लक्ष्मण उघडे (वय 56) या आदिवासी मजुरासह शेळीचा ही मृत्यू झाला. रविवार (दि.4) रोजी दुपारनंतर अकोले तालुक्यात जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. यावेळी रामदास उघडे हे शेतातून शेळ्या चारुन घरी येत असतांना सव्वा एकच्या दरम्यान वीज पडून त्यांचा मृत्यू झाला.