खडकवासला : खडकवासला धरणात पोहण्यासाठी गेलेल्या ९ मुली पाण्यात बुडाल्या होत्या. पण, स्थानिकांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे नऊ मुलींपैकी सात मुलींना वाचवण्यात यश आले आहे. परंतु दोन मुलींचा मृत्यू झाला आहे. गोऱ्हे खुर्द तालुका हवेली गावच्या हद्दीत ही घटना घडली आहे.
गोऱ्हे-खुर्द गावच्या हद्दीत पोहण्यासाठी नऊ मुली गेल्या होत्या. यावेळी मुली पाण्यात बुडू लागल्या. स्थानिकांच्या प्रसंगावधानामुळे सात मुलींना वाचविण्यात यश आले आहे. परंतु, दोन मुलींचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच हवेली पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.
खुशी संजय खुर्दे (वय १४), शीतल भगवान टिटोरे (वय १५) या दोन मुलींचा मृत्यू झाला आहे. पोहण्यासाठी पाण्यात उतरलेल्या या सगळ्या मुली बुलढाणा जिल्ह्यातील असून, पुण्यातील गोरे खुर्द गावात त्यांच्या नातेवाईकाकडे बारशाचा कार्यक्रमाला आल्या होत्या. या दोघींच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
कलमाडी फार्म हाऊस जवळ खडकवासला धरणाच्या पाण्यात आज सकाळी नऊ मुली पोहण्यासाठी उतरल्या होत्या. त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने सर्वच्या सर्व नऊ मुली पाण्यात बुडू लागल्या.
तेव्हा दशक्रिया विधीसाठी आलेल्या संजय माताळे ,राजेंद्र जोरी कालिदास मासाळे, शिवाजी माताळे रमेश भामे हे मदतीसाठी धावले.या स्थानिकांनी मुलींना वाचविण्यासाठी धाव घेत सात जणींना वाचवले आहे.