मुंबई – सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ‘बॅनर्स’ हा चर्चेचा विषय ठरत असून, राष्ट्रवादीच्या अनेक राजकीय नेत्यांचे ‘भावी मुख्यमंत्री’ असे लिहिण्यात आलेले बॅनर्स लावण्यात येत आहेत. काहीदिवसांपूर्वीच विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे ‘भावी मुख्यमंत्री’ अशा आशयाचे बॅनर्स लावण्यात आले होते. त्यामुळे एकच गोंधळ निर्माण झाल्याचं दिसून आलं.
दरम्यान, अश्यातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे देखील नागपुरात “भावी मुख्यमंत्री’ असे लिहिण्यात आलेले बॅनर्स लावण्यात आले आहे. भाजपचे पदाधिकारी बबलू गौतम यांनी हा बॅनर लावला असून, सध्या सगळीकडे याच बॅनरची चर्चा रंगू लागली आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार का? अशी चर्चा आता होताना दिसत आहे.
मात्र, आता या सगळ्या प्रकरणावर स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने देवेंद्र फडणवीस हे कर्नाटकमध्ये पोहोचले आहेत. यावेळी त्यांनी वृत्तवाहिनीली मुलाखत देतांना बॅनर प्रकरणावर आपलं मत व्यक्त केलं आहे.
यावेळी ते म्हणाले, “नागपूरमध्ये भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले. ज्या कोणी लावले त्यांनी काढून टाकावेत, मुर्खपणा करु नये, अतिउत्साही लोकं असतात, तेच असं करतात. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, 2024 मध्ये तेच मुख्यमंत्री असतील. त्यांच्याच नेतृत्वात आम्ही विधानसभा निवडणूक लढवू.’ असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.