नवी दिल्ली – रामनवमीच्या मुहूर्तावर देशभरात अनेक ठिकाणी हिंसाचार उसळला होता. रामनवमीच्या दिवशी झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार सतर्क झाले आहे. गृह मंत्रालयाने आता हनुमान जयंती संदर्भात एक सूचना जारी केली आहे. अॅडव्हायझरीमध्ये सर्व राज्यांना कायदा आणि सुव्यवस्था राखण्यास सांगण्यात आले आहे.
देशभरामध्ये हनुमान जयंतीचा उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जातो. हनुमान जयंतीच्या तयारीबाबत मंत्रालयाने सर्व राज्यांना काही सूचना जारी केल्या आहेत. यामध्ये सर्व राज्य सरकारांना कायदा व सुव्यवस्था राखण्यास सांगितले आहे. याशिवाय सण शांततेत पाळण्यास आणि समाजातील सलोखा बिघडविणाऱ्यांवर नजर ठेवण्यासही सांगण्यात आले आहे.
कोलकाता हायकोर्टाने हिंसाचारावर कडक निर्णय दिला आहे
पश्चिम बंगालमधील हिंसाचारावर कोलकाता उच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेतली आहे. हनुमान जयंतीनिमित्त राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी काय पावले उचलली जात आहेत, अशी विचारणा न्यायालयाने ममता बॅनर्जी सरकारला केली. यासोबतच हनुमान जयंतीनिमित्त शांतता राखण्यासाठी पोलिसांना मदत करण्यासाठी केंद्रीय दले मागवण्याचे निर्देश न्यायालयाने राज्य सरकारला दिले.
रामनवमीच्या मिरवणुकीत झालेल्या हिंसाचाराबद्दल मंगळवारी उच्च न्यायालयाने राज्य सरकारकडून अहवाल मागवला होता. हायकोर्टाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती टी.एस.शिवग्ननम आणि हिरण्मॉय भट्टाचार्य यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला या संदर्भात पुरवणी प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश दिले आणि रिसडा येथील हिंसाचाराच्या कारणांची माहिती मागवली.