पंढरपूर – गौतमी पाटीलच्या लावणीने अल्पावधीतच अनेकांना वेड लावले आहे. सध्या तिच्या लावणीची लोकप्रियता प्रचंड वाढल्याचे दिसते. अनेक ठिकाणी तिच्या कार्यक्रमांना मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसते. पंढरपूरमधील वेळापूर येथील अर्धनारी नटेश्वर यात्रा समितीच्या वतीने विराट पालखी मैदानावर गौतमी पाटीलच्या कार्यक्रमचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तिच्या कार्यक्रमाला मोठी गर्दी झाली होती. मात्र काही हुल्लडबाजांमुळे कार्यक्रमात गोंधळ निर्माण झाला होता.
गौतमी पाटीलची एंट्री होताच कार्यक्रमात काही तरुणांनी गोंधळ करण्यास सुरूवात केली होती. यावेळी आयोजकांकडून वारंवार शांत राहण्याचे आवाहन करण्यात येत होते. मात्र तरी देखील काही जणांची हुल्लडबाजी सुरूच होती. हा प्रकार पाहून त्यामुळे पोलिसांनी थेट लाठीचार्ज करण्यास सुरुवात केली.
मात्र, तरीही लोक ऐकण्यास तयार नव्हते. त्यानंतर गोंधळ अधिकच वाढत गेला. अखेर या कलाकारांनी कार्यक्रम बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतरही प्रेक्षकांना शांततेचं आवाहन केलं जात होतं. पण प्रेक्षक काही ऐकायला तयार नव्हते. त्यांची हुल्लडबाजी शेवटपर्यंत सुरूच राहिली.
दरम्यान, गौतमी पाटीलचा कार्यक्रम नेहमीच वादाच्या भोवऱ्यात अडकल्याचं पाहायला मिळत आहे. याआधी पुण्याच्या खेड तालुक्यात गौतमी पाटीलच्या अदाकारीचा थरार रंगला होता. गौतमीच्या अदाकारीवर तरुणाई एकमेकांच्या खांद्यावर बसून थिरकले. मात्र, काहीच वेळात कार्यक्रमात मोठा राडा होऊन एकमेकांना हाणामारी झाल्याचा प्रकार घडला होता.