ठाणे – जे चांगले लोकं एकत्र येतात, त्याला वज्रमूठ असे म्हणतात. हे तर वज्रझूठ आहे. खरं म्हणजे खोटी लोकं आणि सत्तेसाठी हपापलेली लोकं एकत्र आली आहेत. सभा घेण्याचा अधिकार सर्वांना आहे. परंतु ज्या वृत्ती आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्यांना पाठिशी घालणं, त्यांच्यासोबत बसणं ही कसली वृत्ती आहे.
छत्रपती संभाजीनगर म्हणून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी घोषणा केली होती. त्याचठिकाणी ही सभा होत आहे. याच्यापेक्षा दुसरं दुर्दैवं काय?, बाळासाहेबांना देखील यातना आणि वेदना होत असतील, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर टीका केली.
ठाणे येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते म्हणाले की, स्वातंत्र्यवीरांनी स्वत:च्या जिवाची पर्वा न करता थेट समुद्रात उडी मारली. हे लोक सत्तेसाठी वेळोवेळी कोलांट्या उड्या मारत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवणार?, असा टोलाही त्यांनी लगाविला.
ज्या पक्षाने संभाजीनगरच्या नामांतराला विरोध केला होता, त्याचठिकाणी ही सभा होत आहे, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता शिंदे म्हणाले की, हेच तर दुर्दैवं आहे. महाराष्ट्रातील जनता सूज्ञ आहे. याला चोख उत्तर मिळेल. बाळासाहेब ठाकरेंचं संभाजीनगर हे आवडीचे शहर होते. त्याच ठिकाणी सभा होत आहे. राहुल गांधींनी सावरकरांबद्दल जे अपशब्द काढले. त्यांचा निषेध करण्याची तरी हे हिंमत दाखवतील का?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
हे तीन तिघाडा काम बिघाडा आहे. ही लोकं विचारांसाठी एकत्र न येता सत्तेसाठी एकत्र आली आहेत. आमची विचारांची युती होती. 2019 साली भाजप-शिवसेना युती लोकांसाठी अपेक्षित होते. परंतु आपण सत्तेसाठी विचार बाजूला ठेवले. केवळ खुर्ची आणि सत्तेसाठी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली, असं म्हणत शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.