पुणे :- भारतीय क्रिकेटच्या आधुनिक इतिहासात 2 एप्रिल हा दिवस अजरामर आहे. याच दिवशी टीम इंडियाने 2011 मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली एकदिवसीय विश्वकरंडकावर आपले नाव कोरले होते. 1983 मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन बनल्यानंतर, तब्ब्ल 28 वर्षे विश्वकरंडक ट्रॉफीचा दुष्काळ धोनीने विजयी षटकार मारून संपविला होता. नुवान कुलसेकराच्या लॉंग-ऑनवर धोनाचा तो षटकार अजूनही भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या अंगावर शहारे आणतो.
भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील या सुवर्ण घटिकेला आज एक तप पूर्ण झाले असले तरी, तो क्षण, तो दिवस आजही प्रत्येक भारतीय चाहत्यांच्या हृदयात जिवंत आहे. 2007 मध्ये पहिल्यांदा झालेल्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेचे विश्वविजेतेपद जिंकून दिल्यानंतर अर्थातच एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेसाठी कर्णधार धोनीकडून भारतीयांचा आशा वाढल्या होत्या. अर्थातच धोनीनेही चाहत्यांचा त्याच्यावरील विश्वास सार्थ ठरवित भारताच्या विजयाचा षटकार ठोकला होता. श्रीलंकेविरुद्धच्या या अंतिम सामन्यात भारताने 6 गडी राखून विजय मिळवत घरच्या भूमीवर प्रथमच विश्वकरंडक जिंकण्याची किमया साधली होती.
2011चा विश्वकरंडक भारतीय चाहत्यांसाठी अनेक कारणांनी खास होता. पहिली गोष्ट म्हणजे भारताने मायदेशात पहिल्यांदा विश्वकरंडक जिंकला होता. दुसरी विशेष बाब म्हणजे महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचे विश्वकरंडकाचे स्वप्न अखेर साकार झाले होते. विश्वकरंडक जिंकल्यानंतर सचिनला आपल्या खांद्यावर उचलून घेत संपूर्ण वानखेडे स्टेडियमची मारलेली चक्कर व सचिनच्या डोळांतील आनंदांश्रूंनी अनेकांच्या मनाचा ठाव घेतला होता.
अंतिम फेरीत श्रीलंकेशी सामना
19 फेब्रुवारी 2011 रोजी यजमान भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामन्याने विश्वकरंडकाचा नारळ फुटला. ही स्पर्धा भारत, बांगलादेश आणि श्रीलंका या देशांत संयुक्तपणे आयोजित करण्यात आली होती. बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या सामन्यापासून भारताने सुरू केलेली विजयी घोडदौड श्रीलंकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात येवून थांबली. अंतिम सामन्यात श्रीलंकेच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यादरम्यान भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेच्या संघाला सुरुवातीचे धक्के दिले पण अनुभवी फलंदाज महेला जयवर्धनेने एका टोकाला उभे राहून 88 चेंडूत 103 धावांचे शतक झळकावले. जयवर्धनच्या या शतकी खेळीमुळे श्रीलंकेने निर्धारित 50 षटकांत भारतासमोर 275 धावांचे आव्हान ठेवले.
अखेर आला तो सुवर्णक्षण
श्रीलंकेच्या 275 धावांच्या प्रत्युत्तरात भारतीय संघाची सुरुवात डळमळीत झाली. सचिन तेंडुलकर (18) आणि वीरेंद्र सेहवाग (0) या दोन्ही सलामीवीरांना लसिथ मलिंगाने पॅव्हेलियनमध्ये परतवले. प्रेक्षक निराश होते, मात्र दुसऱ्या टोकाला गौतम गंभीरने आपला वेग कायम ठेवला. गंभीर आणि विराट कोहली (35) यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी 83 धावांची भागीदारी झाल्याने भारतीयांच्या आशा पल्लवित झाल्या.
पाचव्या क्रमांकावर धोनीने युवराजला न पाठवून स्वतः येण्याचा निर्णय घेतला. गंभीरसह माही भारताचा ट्रबलशूटर बनला. दोघांनी चौथ्या विकेटसाठी 109 धावांची भागीदारी करून सामना भारताच्या हातात दिला. गंभीरचे शतक अवघ्या तीन धावांनी हुकले, मात्र त्याचे योगदान अविस्मरणीय होते. अखेर धोनीने त्याच्या खास शैलीत षटकार ठोकत भारताचा सुवर्णक्षण आनला आणि खेळाडूंसह असंख्य भारतीयांचे डोळे पाणावले.