मुंबई : आज विधानसभेचे कामकाज सुरु होताच विरोधक आणि सत्ताधारी नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार, माजी मंत्री धनंजय मुंडे आणि भाजपा आमदार अतुल भातखळकर यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाचा सरकारला अर्थसंकल्पात विसर पडला का? , असा सवाल धनंजय मुंडेंनी उपस्थित केला होता. पण, ज्यांनी गोपीनाथ मुंडेंच्या पाठीत खंजीर खुपसला, त्यांना प्रेमाचे उमाळे येत आहेत, असे सडेतोड उत्तर अतुल भातखळकर यांनी दिले आहे.
अतुल भातखळकर बोलताना म्हणाले, “धनंजय मुंडेंना अर्थसंकल्पीय भाषणात आम्ही ज्यांना आयुष्यभर नेते मानलं, अशा स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंची आठवण येत होती. अर्थसंकल्पात मुंडेंचा विसर पडल्याचं ते सांगत आहेत. पण, ज्यांनी जिवंतपणी आमदारकी मिळाल्यानंतर गोपीनाथ मुंडेंच्या पाठीत खंजीर खुपसला, मनस्ताप दिला, त्यांना प्रेमाचे उमाळे येत आहेत. याला पुतणा-मावशीचं प्रेम म्हणतात.”
धनंजय मुंडेंनी भातखळकरांच्या भाषणावर आक्षेप घेत, “भातळखरांनी माझं नाव घेतलं, माझ्यावर आरोप केला, त्याला हरकत आहे. भातखळकरांना माझा राजकीय प्रवास माहिती आहे. मी मुंडे साहेबांचा पुतण्या आहे. पंडीत आण्णांचा चिरंजीव आहे. मी पाठीत खंजीर खुपसला नाही. ११ जानेवारी २०१२ ला मला आणि माझ्या वडिलांना पक्षातून काढत, रक्ताचं नातं तोडण्याची घोषणा झाली.”असे स्पष्टीकरण यावेळी मुंडेंनी दिले.
“मुंडे साहेबांच्या पाठीत कोणी-कोणी खंजीर खुपसला याचं सर्वजण साक्षीदार आहेत. दहा वर्ष त्याच संघर्षातून येथे आलो आहे. त्यामुळे व्यक्तीगत आरोप करू नये,” असा सल्ला धनंजय मुंडेंनी दिला. यावर अतुल भातखळकर यांनी म्हटलं, “कितीही नाटकी पणाने बोलला तर महाराष्ट्र फसणार नाही. अनेक ज्येष्ठ कार्यकर्त्यांना बाजूला सारून तुम्हाला आमदार केलं. तरी गोपीनाथ मुंडेंना मनस्ताप देण्याचं काम तुम्ही केलं, ही वस्तुस्थिती आहे.” असा आरोप भातखळकर यांनी केला.