मुंबई – अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असताना त्याबद्दल कोणतीही घोषणा होत नाही, तर छ. संभाजीनगर येथे सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असताना शेतकरी आत्महत्या ही रोजचीच आहेत, त्यात नवीन काय, असे वक्तव्य राज्याच्या कृषिमंत्र्यांनी केले. त्यामुळे कृषिमंत्री अतिशय संवेदनाहीन आहेत अशी जहाल टीका माजी मंत्री आ. छगन भुजबळ यांनी केली.
पुढे भुजबळ म्हणाले की, शेतकऱ्यांवरचा खर्चाचा भार हा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. मागे दोनशे आणि आता शंभर वाढवले यावरून कसलाही हिशोब लागू शकत नाही. शेतकऱ्याला कांदा उत्पादनात बाराशे रुपये क्विंटल खर्च येतोय, मात्र शेतकऱ्यांना पाचशे-सातशे रुपये हाती येतात. त्यामुळे करोडो रुपये खर्च करणाऱ्या राज्य सरकारने शेतकऱ्यांना निदान पाचशे रुपये तरी अनुदान द्यावे, अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली. ही मागणी पूर्ण न करता शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली जात आहेत, असा संताप व्यक्त करत त्यांनी सभात्याग केला.
कृषीमंत्र्याचे वादग्रस्त विधान….
शेतकरी आत्महत्या ही नवी समस्या किंवा नवा प्रकार नाही आणि महाराष्ट्रात अशा घटना अनेक वर्षांपासून घडत आहेत असे काहीसे बेफिकीरीचे विधान राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले आहे. (Farmers ending their lives is not new issue: Maharashtra Agriculture Minister Abdul Sattar) अलीकडेच औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड या त्यांच्याच मतदारसंघातील शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्येबाबत पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला असता त्यावर प्रतिक्रिया देताना कृषी मंत्र्यांनी हे विधान केले.
दरम्यान, देशातील कांदा उत्पादन त्याची देशांतर्गत मागणी व देशातून होणारी निर्यात इत्यादी सर्व बाबींचा परिणाम बाजारपेठेतील कांद्याच्या दरावर होतो आणि झालेला आहे. उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने एक समिती नेमली होती. समितीने दोनशे आणि तीनशे रुपये प्रति क्विंटल शिफारस केली होती. परंतु सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहणारे असून त्यांना दिलासा देण्यासाठी सानुग्रह अनुदान म्हणून प्रति क्विंटल 300 रुपये देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली. या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.