पुणे – गेल्या चार दिवसांपासून राज्यभरात चर्चेचे राहिलेल्या पुण्यातील स्पर्धा परीक्षा उमेदवारांच्या आंदोलनाची दखल अखेर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला (एमपीएससी) घ्यावी लागली. राज्यसेवा परीक्षा पद्धतीतील नवे बदल यावर्षी ऐवजी 2025 पासून लागू करण्यात येत असल्याचे आयोगाने गुरुवारी जाहीर केले.
आयोगाने आज ट्विट करीत निर्णयाची माहिती दिली. उमेदवारांकडून होत असलेली मागणी लक्षात घेत सुधारित परीक्षा पद्धत लागू करण्याचा निर्णय आयोगाने दोन वर्षे पुढे ढकलला आहे. त्यामुळे या वर्षापासून नवी परीक्षा पद्धत लागू होणार नसल्याचे स्पष्ट होताच उमेदवारांनी आयोगाच्या निर्णयाचे स्वागत केले. आंदोलनही मागे घेतले. त्यामुळे या विषयावर अखेर पडदा पडला.
राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या वर्णनात्मक स्वरूपाच्या परीक्षेसंदर्भातील उमेदवारांची मागणी, कायदा व सुव्यवस्थेची निर्माण झालेली परिस्थिती व उमेदवारांना तयारीसाठी द्यावयाचा अतिरिक्त कालावधी विचारात घेऊन सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम सन 2025 पासून लागू करण्यात येत आहे. असं ट्विट महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने केलं आहे.
लोकसेवा आयोगाच्या निर्णयानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, “तुम्ही केलेल्या संघर्षाला यश आले आहे. आता जोमाने तयारीला लागा. एमपीएससीच्या परीक्षेत तुम्हाला उत्तम यश लाभेल आणि तुम्ही राज्याच्या प्रशासकीय सेवेत भरीव योगदान भविष्यात द्याल, याचा मला विश्वास आहे. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!”
तुम्ही केलेल्या संघर्षाला यश आले आहे. आता जोमाने तयारीला लागा. एमपीएससीच्या परीक्षेत तुम्हाला उत्तम यश लाभेल आणि तुम्ही राज्याच्या प्रशासकीय सेवेत भरीव योगदान भविष्यात द्याल, याचा मला विश्वास आहे. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!#MPSC
— Sharad Pawar (@PawarSpeaks) February 23, 2023
दरम्यान, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आंदोलनस्थळी भेट देत उमेदवारांच्या मागण्या रास्त असल्याची बाब राज्य सरकारच्या निदर्शनास आणून दिली होती.