राज्यातील राजकीय वैमनस्याने आता पूर्ण वेगळे वळण घेतले असल्याचे सध्या दिसते आहे. आज माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्यावर पाळत ठेवली जात असून त्यातून आपलाही विनायक मेटे करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा खळबळजनक दावा केला आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आपल्याला ठार मारण्याची सुपारी ठाण्यातील एका गुंडाला दिली गेली असल्याचेही आजच म्हटले आहे. तसे पत्र त्यांनी मुंबई, ठाणे यांच्या पोलीस आयुक्तांना पाठवले असून गृहमंत्री या नात्याने त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनाही तसे पत्र पाठवले आहे.
आज आलेल्या या लागोपाठ दोन बातम्यांनी राज्यातील राजकीय वातावरण एका वेगळ्या वळणावर जात असल्याची जाणीव होऊ लागली आहे. हा घटनाक्रम सुसंस्कृत महाराष्ट्राला लाजीरवाणा ठरू पाहात आहे. आपण एरवी यूपी, बिहारच्या द्वेषमूलक राजकारण्यांच्या आणि तेथील राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या गुंडांच्या कृत्यांच्या बातम्या वाचत असतो. आता तेच लोण महाराष्ट्रातही येऊ पाहात आहे हे काही चांगले लक्षण मानता येणार नाही. वरील दोन नेत्यांपैकी अशोक चव्हाण यांनी कोणाचे नाव घेतलेले नाही, पण संजय राऊत यांनी मात्र आपल्याला मारण्याची सुपारी कोणत्या गुंडाला कोणी दिली याचे नाव आपल्या पत्रात नमूद केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, ठाण्याचे खासदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांनी ठाण्यातील राजा ठाकूर नावाच्या गुंडाला ही सुपारी देण्यात आल्याचे म्हटले आहे.
तर दुसरीकडे अशोक चव्हाण यांनीही आपल्याला राजकीय स्पर्धेतून संपवण्यासाठी हा डाव रचण्यात आल्याचे म्हटले आहे. आपल्या नावाची बोगस लेटरहेड्स तयार करून त्यावर खोटा मजकूर टाकून आपण मराठा समाजाच्या विरोधात कसे आहोत असे भासवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे अशोक चव्हाणांनी म्हटले आहे. तशी काही बनावट पत्रेही त्यांनी हस्तगत केली आहेत असे सांगण्यात येत आहे. त्याबद्दल त्यांनीही पोलिसांना तक्रार दिली आहे. हा सारा प्रकार सुन्न करणारा ठरत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाने इतकी भीषण पातळी कधीही गाठली नव्हती. राजकारणात विरोधकांची कोंडी करणे किंवा त्यांना कात्रीत पकडणे हे चालतच असते. पण त्याला काही मानमर्यादा ठेवल्या जायच्या, पण आता राजकीय नेत्यांना संपवण्याचे सत्र सुरू झाले आहे काय, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांची पोलीस सुरक्षा या आधीच काढून घेण्यात आली आहे. राऊत हे लढवय्ये नेते आहेत.
भाजपकडून शिवसेना संपवण्यासाठी टोकाचे पाऊल उचलले गेले असले तरी राऊत अजून बधलेले नाहीत. त्यामुळे त्यांना धमक्या सुरू झाल्या आहेत. अशा वातावरणात त्यांची पोलीस सुरक्षा काढून घेणे धोकादायक ठरले आहे. त्यांनी आपल्याविरोधात दिल्या गेलेल्या सुपारीचा उल्लेख केल्यानंतर या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. राज्यातील ज्येष्ठ नेत्यांवर गुदरलेले हे प्रसंग एकीकडे आणि दुसरीकडे शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या समर्थकांनी एकमेकांना शड्डु ठोकत गावोगावी दिलेल्या आव्हानांमुळे गावपातळीपर्यंतही राजकीय तणावाची स्थिती पोहोचली आहे. या सगळ्या घटनांचा आणि पार्श्वभूमीचा नीट विचार केला तर भारतीय जनता पक्षाच्या राजकारणाची रितच या सगळ्याला कारणीभूत ठरत आहे, असाही आरोप होऊ लागला आहे. राजकारणातील समंजसपणा हा इतिहासजमा झाल्याचेच हे वातावरण आहे. या स्थितीत सुधारणा करण्याची आणि राजकारणातील सलोख्याचे वातावरण कायम ठेवण्याची जबाबदारी सरकारचीच आहे. त्यातही विशेषत: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ही जबाबदारी अधिक आहे. पण फडणवीस यांनी आजवर कधीच यात पुढाकार घेतलेला दिसला नाही.
एका जबाबदार पदावर बसलेल्या फडणवीस यांच्यासारख्या सक्षम नेत्याने समंजस वातावरण निर्माण करण्यासाठी लगबगीने पुढाकार घेतला पाहिजे, अशी अपेक्षा असताना सध्या ते अधिकच आक्रमक होताना दिसत आहेत. उद्धव ठाकरे यांनी भाजपला अडीच वर्षे सत्तेपासून दूर ठेवले याचा राग भाजपचे लोक विसरू शकले नाहीत. खरे पाहता ठाकरे यांचे सरकार पाडण्यात आल्यानंतर आणि भाजप-शिंदे गट बहुमताने सत्तेवर आल्यानंतर हे ढवळून निघालेले राजकारण शांत होणे अपेक्षित होते. पण नव्या सत्ताधाऱ्यांनी अधिक त्वेषाने सर्व आयुधांचा वापर करीत शिवसेनेचे नामोनिशाणच मिटवून टाकण्याचे काम हाती घेतले. एवढे करूनही हे लोक थांबलेले नाहीत. नारायण राणे किंवा त्यांच्या दोन्ही चिरंजीवांकडून किंवा शिंदे गटाच्या आमदारांकडून सध्या जी आक्रमक भाषा वापरली जात आहे त्यातून राजकारणाचा स्तर दिवसेंदिवस खालावतानाच दिसत आहे. कानाखालीच लावली असती, थोबाडच रंगवले असते अशी वाक्ये आता कोणा ना कोणा राजकारण्यांच्या तोंडून राजरोस ऐकताना मिळणे लाजीरवाणे ठरू लागले आहे. या साऱ्या प्रकारात कोणीही कोणाला सबुरीने घेण्याची सूचना करताना दिसत नाही, हे विशेष.
पूर्वी एखाद्या तरुण लोकप्रतिनिधीने आपल्या वयानुरूप काही आगळीकीचे वक्तव्य केले, तर त्याच्या पक्षातील अन्य ज्येष्ठ नेत्यांकडून त्याला जाहीरपणे सबुरीचे सल्ले दिले जायचे. पण आज मात्र सगळ्याच पक्षांतील ज्येष्ठांनीही या भूमिकेतून आपले अंग काढून घेतलेले दिसते आहे. सगळ्याच पक्षांनी सगळ्यांना मोकळे सोडले आहे. एखाद्याने आक्रमक वक्तव्य केले तर त्याच्या विरोधातील नेत्यांकडून त्यापेक्षाही आक्रमक आणि धमक्यांच्या भाषेचा वापर करणे ही नेहमीचीच बाब होऊन बसली आहे. आतापर्यंत एकमेकांना केवळ कोरड्या धमक्या देण्यापर्यंतचा हा विषय आता राजकीय विरोधकांना संपवण्याच्या स्तरापर्यंत जात असेल तर महाराष्ट्र, यूपी, बिहार स्टाइल राजकारणाच्या वाटेने निघाला असल्याचे भासते आहे. सूज्ञ, समंजस माणसांना राजकारणाच्या क्षेत्रापासून दूर ठेवण्यासाठीचाच हा खटाटोप नाहीना, असाही प्रश्न कधीकधी पडतो. हे काहीही असले तरी आता मात्र सगळ्याच पक्षाच्या ज्येष्ठांनी जबाबदारीची भूमिका वठवण्याची वेळ आली आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणाचे स्वरूप सुसंस्कृतपणाचेच राहील, याची खबरदारी राजकारणातील सर्वांनीच घ्यावी आणि धोकादायक बनत चाललेल्या स्थितीतून राज्य लवकर सावरावे, हीच अपेक्षा आहे.