मुंबई : निवडणूक आयोगाने शिंदे गटाला ‘शिवसेना’ नाव आणि ‘धनुष्यबाण’ पक्षचिन्ह दिल्यानंतर उद्धव ठाकरे आक्रमक झाले आहेत. निवडणूक आयोगाचा निकाल एकांगी असून आपण तो मानायला तयार नाही, तसेच निवडणूक आयोग बरखास्त करा, अशी मागणीही उद्धव ठाकरे यांनी केली. दरम्यान, त्यांच्या या मागणीवर शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
साताऱ्यात माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना शंभूराज देसाई यांनी, “उद्धव ठाकरेंची ही मागणी हास्यास्पद आहे. घटनेने निवडणूक आयोगाची रचना केली आहे. राष्ट्रपतींच्या मान्यतेने निवडणूक आयुक्तांची नेमणूक केली जाते. घटनात्मक पदसुद्धा बरखास्त करा, असे उद्धव ठाकरे म्हणत असतील तर हे लोकशाहीसाठी घातक आहे. उद्धव ठाकरेंसारख्या अनुभवी नेत्याने अशाप्रकारे लोकशाहीला मारक असलेलं वक्तव्य करणं पूर्णपणे चुकीचं आहे. ही एकप्रकारे लोकशाहीची थट्टा केल्याचा प्रकार आहे”, असे मत शंभूराज देसाई यांनी दिली.
यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंवर खोचक टीकाही केली. “उद्धव ठाकरे मातोश्रीवर बसून निवडणूक आयोग बरखास्त करू शकतात. त्यांनी मातोश्रीवर बसून एक आदेश काढाला तर निवडणूक आगोय बरखास्त होऊ शकतो”, असे म्हणत त्यांच्या मागणीची खिल्ली उडवली.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत सुपारी घेऊन शिवसेना संपवण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका केली होती. यावरही शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली. “काँग्रेस-राष्ट्रवादी बरोबर जाऊन उद्धव ठाकरे यांनी स्वता:च्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे. कोणीही कोणाला सुपाऱ्या देण्याची आवश्यकता नाही. लोकशाहीत जनता सुज्ञ आहे. योग आणि अयोग्य यातला फरक जनतेला कळतो”, असे ते म्हणाले.