मुंबई – “शिवसेना’, “धनुष्यबाण’ या दोन्ही गोष्टी परत मिळवायच्या असतील तर उद्धव ठाकरे यांच्यापुढे दोन पर्याय आहेत. एक सर्वोच्च न्यायालय आणि दुसरा “जनता की अदालत’ दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्यासाठी आता केवळ “शिवसेना’ आणि “धनुष्यबाण’ परत मिळविणे पुरेसे होणार नाही, तर महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात स्वतःला प्रस्थापित करण्यासोबतच “ठाकरे’ या नावाला पर्याय नाही हेही सिद्ध करून दाखवावे लागेल. किंबहुना, त्यांच्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे. पूर्वजांच्या पुण्याईतून बाहेर पडून स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी आयोगाच्या माध्यमातून चालून आली आहे, असेही म्हणायला हरकत नाही.
अशातच आता पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे दुसरे चिरंजीव तेजस ठाकरे हे राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये येत आहेत. आजवर राजकारणापासून अलिप्त असणारे, पर्यावरणात रमणारे ..! त्यांनी युवा सेनेची धुरा खांद्यावर घ्यावी, अशी मागणी आधीपासूनच होत होती. आता ती वेळ आलेली दिसते.
एकनाथ शिंदे यांच्यासह काही आमदारांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर देखील तेजस ठाकरे राजकारणात सक्रिय होणार असल्याच्या बातम्या अनेकदा प्रसिद्ध झाल्या होत्या. यावर्षी दहीहंडीनिमित्त गिरगावमध्ये तेजस ठाकरे यांचे फ्लेक्स झळकल्याचे पाहायला मिळाले होते. आता पक्ष चिन्ह आणि नाव परत मिळविण्यासाठी तेजस ठाकरे यांनी मैदानात उतरावे अशी मागणी शिव सैनिकांकडून होत आहे.
दरम्यान, तेजस ठाकरे राजकारणात येतील का? पद घेतील का? हे मला सांगता येणार नाही. मात्र, तेजस ठाकरे जेव्हा स्वत: ठरवतील, पक्षप्रमुखांना वाटेल, तेव्हा ते राजकारणात येतील याबद्दल शंका नाही. ते योग्यवेळी निर्णय घेतील. असे युवा संवाद अंतर्गत युवा सेनेचे सचिव वरूण सरदेसाई यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले होते.