इस्लामाबाद : पाकिस्तानची अत्यंत खराब आर्थिक व्यवस्था जगापासून लपलेली नाही. त्याचा एक थेट परिणाम म्हणून आता हजारो नागरिकांनी पाकिस्तान सोडण्याचा निर्णय घेतला आहे.. गेल्या काही महिन्यांमध्ये पाकिस्तान सोडून इतर देशात जाण्याच्या प्रक्रियेत वाढ झाली आहे. यामध्ये सुशिक्षित नागरिक आणि कुशल कामगारांचा सर्वात जास्त समावेश आहे.
गेल्या काही कालावधीमध्ये पाकिस्तानमध्ये वाढलेल्या दहशतवादी घटना आणि पाकिस्तानची ढासळलेली अर्थव्यवस्था यामुळेच अनेक नागरिकांना पाकिस्तानमध्ये आपले भवितव्य सुरक्षित आहे असे वाटत नाही. साहजिकच अनेकांनी नोकरीच्या निमित्ताने किंवा इतर कारणांनी पाकिस्तान सोडून इतर देशात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तान सरकारच्याच ब्युरो ऑफ इमिग्रेशन अँड ओवरसीज एम्प्लॉयमेंट या संस्थेच्या आकडेवारीचा आधार घेतला तर 2022 या एका वर्षामध्ये आठ लाख 32 हजार पाकिस्तानी नागरिकांनी आपला देश सोडून इतर देशांमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे.
गेल्या कित्येक वर्षातील हा सर्वात जास्त आकडा आहे .पाकिस्तानी नागरिकांची सर्वात जास्त पसंती सौदी अरेबियाला असून पाच लाख पेक्षा जास्त लोक सौदी अरेबियामध्ये स्थायिक झाले आहेत. अर्थात इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे पाकिस्तान सोडून जाणाऱ्यांची संख्या यापेक्षाही जास्त असू शकते जे आकडे पाकिस्तान सरकारकडून जाहीर करण्यात आले आहेत. त्यामध्ये फक्त वर्क विजाच्या निमित्ताने पाकिस्तान सरकारशी संपर्कात असलेल्या लोकांच्या नोंदी आहेत. पाकिस्तानमधील वाढती महागाई आणि कर्जाचा डोंगर या पार्श्वभूमीवर पाकिस्तानमधील युवा पिढीला आपले भवितव्य अंधकारमय वाटत आहे.
त्यामुळेच त्यांनी हा देश सोडून इतर जाण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थात 40 ते 60 या वयोगटातील नागरिकांनीही पाकिस्तान सोडून इतरत्र आश्रय घेण्याचा निर्णय घेतल्याची आकडेवारी समोर येत आहे. 40 ते 60 या वयोगटातील नागरिकांना आपल्या मुलाबाळांच्या भवितव्याची चिंता असल्यानेच त्यांना हा निर्णय घ्यावा लागत आहे. पाकिस्तानमधील कुशल आणि सुशिक्षित मनुष्यबळ अशाप्रकारे इतर देशात जात असल्याने आगामी कालावधीमध्ये पाकिस्तानमध्ये मनुष्यबळाची मोठ्या प्रमाणावर टंचाई निर्माण होण्याचा धोका अर्थशास्त्रज्ञांनी बोलून दाखवला आहे.