मुंबई – शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवजयंतीच्या दिवशी किल्ले शिवनेरीवर होणाऱ्या शासकीय कार्यक्रमावर बहिष्कार घातला असून भगवं आंदोलन करणार आहे. ‘हे आंदोलन म्हणजे कुणाचा निषेध अथवा विरोध नसून शासनाला जाणीव करून देण्यासाठी भगवं आंदोलन करीत आहे’. असं म्हंटलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 393 व्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त किल्ले शिवनेरी येथे 18 ते 20 फेब्रुवारीदरम्यान विविध कार्यक्रम पार पडणार आहेत. अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार उदयनराजे भोसले, विरोधी पक्षनेते अजित पवार इत्यादी उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाचे निमंत्रण स्थानिक राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांना देखील दिले आहे. मात्र शासनाच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याचं अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, आता अमोल कोल्हे यांच्या या निर्णयावर भाजपने जोरदार टीका करत त्यांना एक खोचक सवाल देखील केला आहे. भाजपाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून कोल्हे यांच्या भूमिकेवर टीका केली आहे.
राष्ट्रवादीचे खा अमोल कोल्हे यांनी शिवनेरीवर होणाऱ्या शासकीय शिवजयंतीच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. म्हणजे फक्त पैसा आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठीच यांना छत्रपती शिवाजी महाराज हवेत का? हा तर राष्ट्रवादीचा मोगल प्रेमी चेहराच पुन्हा एकदा समोर आला pic.twitter.com/skDlOr2iK9
— Keshav Upadhye (@keshavupadhye) February 17, 2023
केशव उपाध्ये म्हणाले, “राष्ट्रवादीचे खसदार अमोल कोल्हे यांनी शिवनेरीवर होणाऱ्या शासकीय शिवजयंतीच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. म्हणजे फक्त पैसा आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठीच यांना छत्रपती शिवाजी महाराज हवेत का? हा तर राष्ट्रवादीचा मोगल प्रेमी चेहराच पुन्हा एकदा समोर आला’. असा सवाल त्यांनी केला आहे. सध्या त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.
अमोल कोल्हे काय म्हणाले वाचा…
एवढी वर्षे झाली तरी शिवनेरीवर भगवा ध्वज नाही. शिवनेरीवर भगवा ध्वज लावण्यात यावा यासाठी केंद्रीय मंत्र्यांना भेटलो, संसदेच्या पटलावर मागणी ठेवली, राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या धन्यवाद प्रस्तावावर बोलताना आग्रही मागणी केली. संसदेच्या अधिवेशनाच्या आधी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी बोलविलेल्या खासदारांच्या बैठकीत जाणीव करून दिली होती. भगवा ध्वज आमची अस्मिता आहे.
शिवभक्तांचा मोठा गर्व आहे, भावना आहे याचा आदर करून राज्य सरकारने शिवनेरीवर भगवा ध्वज लावण्यासाठी केंद्र सरकारकडे आग्रही मागणी करून पाठपुरावा करावा असे सांगितले होते; परंतु त्यातून काही निष्पन्न होत नाही. ठोस पाऊलं उचलले जात नाही. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळावर कायमस्वरूपी भगवा नाही याची जाणीव करून देण्यासाठी शिवनेरीवर शिवजयंतीच्या दिवशी होणाऱ्या शासकीय कार्यक्रमावर बहिष्कार घातला असल्याचे डॉ. अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे.