नवी दिल्ली : भारतीय क्रिकेटर फिट राहण्यासाठी इंजेक्शनचा वापर करतात असे वक्तव्य आणि त्याचसोबत अनेक वादग्रस्त विधाने करणारे निवड समितीचे चेअरमन चेतन शर्मा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तसेच बीसीसीआय सचिव जय शहा यांनी चेतन शर्मा यांचा राजीनामा स्विकारला आहे.
चेतन शर्मा यांना भारतीय वरिष्ठ पुरूष संघाच्या निवड समितीचे अध्यक्षपद भुषवण्याची दुसऱ्यांदा संधी मिळाली होती. बीसीसीआयने ऑस्ट्रेलियात झालेल्या टी 20 वर्ल्डकपमधील भारताच्या खराब कामगिरीनंतर चेतन शर्मांची निवड समितीच बर्खास्त केली होती. मात्र दुसरी निवडसमिती नियुक्त करताना चेतन शर्मांना पुन्हा एकदा संधी देऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता.
निवड समिती अध्यक्षपद चेतन शर्मा याना मिळाले खरे पण स्टिंग ऑपरेशनमध्ये सापडलेल्या चेतन शर्मांचा आपल्या तोंडावर ताबा राहिला नाही. त्यांनी निवडसमिती आणि बीसीसीआयमधील पडद्यामागील अनेक गुपिते उघड केली. त्यांनी बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली आणि विराट कोहलीमधील वादाबाबत, संघातील दुखापतग्रस्त खेळाडू इंजक्शन घेऊन लवकरात लवकर भारतीय संघात पुनरागमन करण्याचा प्रयत्न करतात अशी वक्तव्ये केली होती.
याचबरोबर त्यांनी आपल्याशिवाय टीम इंडियाचे पान हलत नाही. रोहित-हार्दिक हे आपल्याला लाडीगोडी लावत असतात अशा अविर्भावात अनेक वक्तव्ये केली होती. यानंतर त्यांचावर कारवाईची टांगती तलवार लटकत होती. अखेर बीसीसीआयने चेतन शर्मा यांच्यावर कडक कारवाई करत त्यांना निवड समितीवरून बाजूला केले आहे.