पुणे- आमदार मुक्ताताई टिळक यांच्या अकाली निधनानंतर कसबा विधानसभा मतदार संघात होणाऱ्या पोटनिवडणुकीत अन्य पक्षांपेक्षा भाजपच्याच इच्छुक उमेदवारांची संख्या जास्त आहे. येत्या दोन दिवसांत आपापल्या पक्षाकडून उमेदवाराची घोषणा होईल, अशी अपेक्षा सर्वच इच्छुकांनी बुधवारी “वाडेश्वर कट्ट्या’वर व्यक्त केली. याशिवाय आपणच कसे योग्य उमेदवार आहोत तसेच आपण मतदार संघासाठी काय करू शकतो, याविषयी सांगितले.
यावेळी राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे, श्रीकांत शिरोळे, डॉ. सतीश देसाई, रवींद्र माळवदकर तसेच इच्छुक उमेदवार उपस्थित होते.
इच्छुक उमेदवारांच्या प्रतिक्रिया –
“आजपर्यंत संघटनेत अनेक पदांवर काम केले आहे. विद्यार्थीदशेपासून विद्यार्थी संघटनेचा अनुभव आहे. कसबा विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहे. पक्षात जो काम करतो त्या प्रत्येकाला तिकिट मागण्याचा अधिकार आहे.” – हेमंत रासने, भाजप
“भाजप हिंदुत्वाला मानणारा पक्ष आहे. आजपर्यंत संघटनेत विद्यार्थी दशेपासून काम केले आहे. विविध पदांवर काम केले आहे. पक्षाने मला संधी दिली तर नक्कीच निवडणूक लढवणार.” – धीरज घाटे , भाजप
“आजपर्यंत असा प्रघात आहे की एखाद्या विद्यमानाचे निधन झाले तर त्याच्या कुटुंबातीलच व्यक्तीलाच उमेदवारी दिली जाते. आमदार मुक्ता टिळक यांच्या आजारपणाच्या काळात त्यांचे काम मी पहात होतो. पूर्वीपासून संघटनेच्या कामाचा मला अनुभव आहे. मात्र, उमेदवारीचा पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य असेल.” – शैलेश टिळक, भाजप
“कसबा विधानसभा मतदारसंघात सर्व जाती धर्माचे लोक आहेत. महाविकास आघाडी म्हणूनच येथे लढणार आहोत. हा मतदार संघ कॉंग्रेसचा आहे. येत्या दोन दिवसांत उमेदवारी कोणाला मिळेल हे समजेल. महाविकास आघाडी म्हणून आम्हांला सगळ्यांना तो निर्णय मान्य असेल.” – रवींद्र धंगेकर, कॉंग्रेस
“निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढणार आहोत. हा मतदार संघ सेनेला मिळावा अशी अपेक्षा आहे. सध्या पक्षामध्ये जे सुरू आहे त्यामुळे सेनेबद्दल सहानुभूती आहे, त्यामुळे मला जर उमेदवारी मिळाली तर नक्कीच निवडून येईन. गेल्या 25 वर्षात या मतदार संघात भाजपचा आमदार आहे. मात्र, त्यांनी काहीच काम केले नाही. गेल्या पाच वर्षात 500 कोटी खर्च झाले, परंतू बदल काहीच झाला नाही, उलट पेठांची ग्रामपंचायत झाली. मतदार संघातील नगरसेवकांना स्थायी समिती मिळाली, महापौरपद मिळाले, तरीही परिस्थिती जैसे थेच आहे.” विशाल धनवडे, उद्धव ठाकरे, शिवसेना
“पेठेतील परंपरागत राजकारणाला छेद देत ही निवडणूक आम्ही लढवणार आहोत. आमचा पक्ष ही परंपरा मोडून काढणार आहे. आजपर्यंत गिरीश बापटांचा मतदारसंघ असे म्हटले जात होते. मात्र आता पर्याय पहायला पाहिजेत.” – विजय कुंभार, आप
“आजपर्यंत मी कसबा मतदारसंघातूनच निवडून आले आहे. या मतदारसंघात अनेक कामे केली आहेत. महापालिका निवडणुकीत पाच वेळा निवडून आले आहे. संघटनेत खूप वर्ष काम केले आहे. राष्ट्रीय स्तरापर्यंत काम केले आहे. उमेदवारीची अपेक्षा आहे, परंतू पक्ष जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य आहे.” – कमल व्यवहारे, कॉंग्रेस
“जन्मापासून पेठेत वाढले आहे. त्यामुळे येथील सगळी माहिती आहे. या भागातच नगरसेविका होते. कसब्याचे मूळ प्रश्न माहित आहेत. मुळात कसबा हा कॉंग्रेसचाच बालेकिल्ला होता. भाजपची सत्ता आल्यानंतर गेल्या 25 वर्षांत या मतदार संघाच्या प्रश्नाकडे नीट लक्षच दिले नाही.” – नीता राजपूत, कॉंग्रेस
“पेठांमध्ये जागा, पार्किंग असे अनेक प्रश्न आहेत. गेल्या 40 वर्षांपासून पक्षाचे काम करतो, मी पक्षाकडे आजपर्यंत काहीच मागितले नाही. त्यामुळे कसबा विधानसभेची उमेदवारी मिळावी ही अपेक्षा आहे.” – बाळासाहेब दाभेकर, कॉंग्रेस
“लोकशाहीमध्ये प्रत्येक पक्षाच्या पदाधिकाऱ्याला, कार्यकर्त्याला निवडणूक लढवण्याचा अधिकार दिला आहे. आमच्या बैठकीमध्ये मुंबईहून संपर्कप्रमुख आले होते. सेनेचा उमेदवार या मतदार संघामध्ये असावा आणि त्या माध्यमातून निवडणूक लढवावी असे आमचे मत आहे. या मतदार संघात अनेक वर्षे आम्ही भाजपला पाठिंबा दिला आहे. मात्र आता आमची ताकद आहे, घरोघरी धनुष्यबाण असावा हे आमचे उद्दीष्ट आहे.” – संजय मोरे, उद्धव ठाकरे, शिवसेना