रायपूर (छत्तीसगड) – बागेश्वर धाम सरकार म्हणून ओळखले जाणारे स्वयंभू धर्मगुरू धीरेंद्र शास्त्री यांनी हिंदुराष्ट्र स्थापन करण्यासाठी लोकांनी आपल्याला पाठिंबा द्यावा, असे आवाहन करून त्यांनी पुन्हा एकदा वावटळ उठवली आहे. तुम्ही मला पाठिंबा द्या, मी तुम्हाला हिंदुराष्ट्र करून दाखवतो असे त्यांनी म्हटले आहे.
कोणताही पुजारी, धर्मगुरू किंवा सनातन धर्माला आव्हान देणाऱ्या व्यक्तीला प्रत्युत्तर मिळेल, सनातन धर्माचीच येथे प्रतिष्ठापना केली जाईल असेही त्यांनी यावेळी नमूद केले. रायपूरमधील गुढियारी येथील दहीहंडी मैदानावर आयोजित मेळाव्याला धीरेंद्र शास्त्री संबोधित करत होते. छत्तीसगडमध्ये प्रभू रामांना वनवासाचा सर्वाधिक आनंद मिळाला आणि त्यामुळे त्यांनी आपला बहुतांश वेळ येथे घालवला, असेही ते म्हणाले.शास्त्री यांनी लोकांना सनातन धर्माचे पालन करण्याचे आवाहन केले.
मला जशी प्रेरणा होईल तसे मी लिहीत जाईन आणि मी जे लिहीन तेच खरे होईल असा दावाही त्यांनी केला आहे. या महाराजांना लोकांच्या मनातील भावना समजात आणि त्यांना काही सांगण्याच्या आधी ते या भावना कागदावर लिहीतात असा दावा केला जात आहे. आणि गेले काही दिवस त्यांची ही प्रात्यक्षिके सोशल मिडीयावर चांगलीच व्हायरल झाली आहे.