जयपूर – या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुका जिंकून त्यांचा पक्ष राजस्थानमध्ये तीन चतुर्थांश बहुमताने सरकार स्थापन करेल. भाजप हा एकमेव राष्ट्रीय पक्ष आहे, तर बाकीचे पक्ष कौटुंबिक पक्ष बनले आहेत. त्यामुळे अशा पक्षांची पिछेहाट होणार आहे, असे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी केले आहे. भाजपच्या राजस्थान राज्य कार्यकारिणीच्या बैठकीला नड्डा संबोधित करत होते.
नड्डा पुढे म्हणाले की, भाजप हा एकमेव राष्ट्रीय पक्ष आहे. कॉंग्रेसची ओळख कौटुंबिक पक्ष म्हणून झाली आहे. प्रादेशिक पक्षही घरगुती पक्ष बनले आहेत. भाजप राजस्थान युनिटने जन आक्रोश यात्रा आणि जन आक्रोश सभा यशस्वीपणे आयोजित केल्याने राज्यातले वातावरण बदलले असून लोकांना कॉंग्रेस सरकारचा खोटेपणा समजला आहे. अशोक गेहलोत सरकारच्या काळात राजस्थानची स्थिती वाईट आहे, ज्यामध्ये महिलांवरील गुन्हे, दलित गुन्हे, सायबर गुन्हे यांचा आलेख झपाट्याने वाढत आहे. मात्र, गेहलोत-पायलट वादातच सरकार मश्गुल आहे.
आमचा पक्ष हा विचारांचा पक्ष आहे, आम्ही राजकारणासह मिशन, विचारसरणीसह राजकारण, देश, पक्ष आणि विचारसरणीची सेवा करतो. कॉंग्रेस कोणाला जोडत आहे, कोणाला तोडत आहे, हे त्यांनाच माहित, असे सांगून नड्डा म्हणाले की, राहुल गांधींच्या संपूर्ण प्रवासात भारताविरोधात नारेबाजी झाली, त्यांनी भारताविरोधात षड्यंत्र केले.
भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत राजकीय ठराव मंजूर करण्यात आला. या ठरावानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशभरातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह, ऊर्जा आणि प्रेरणा संचारली आहे. या प्रस्तावानुसार, राजस्थानसह देशातील विविध राज्यांच्या विधानसभा आणि 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांवर याचा सकारात्मक परिणाम होणार आहे. त्यामुळे भाजपचा राजकीय आत्मविश्वास आणखी वाढला आहे. या प्रस्तावात राज्यातील कॉंग्रेस सरकारवर आरोप करत मोदींच्या नेतृत्वाखाली देशात नवे विक्रम प्रस्थापित होत असल्याचे म्हटले होते.