पारनेर – हिंदवी राष्ट्र निर्माण करण्यासाठी शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्या विचारांचे पाईक होण्याची गरज असल्याचे आवाहन संभाजी भिडे गुरुजी यांनी पारनेरमध्ये केले.
जानेवारीमध्ये सुरु होणाऱ्या धारकरी वारीच्या निमित्त पारनेर शहरातल्या नागेश्वर मंदिराच्या सभागृहात नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. २३ जानेवारी रोजी रायरेश्वर ते प्रतापगढ या धारकरी वारीचे आयोजन दरवर्षीप्रमाणे शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान तर्फे करण्यात आले होते. या वारीसाठी शिव प्रतिष्ठानतर्फे पारनेर शहरात पारनेर, श्रीगोंदा, नगर , कर्जत व जामखेड तालुक्याची बैठक आयोजित करण्यात आली होती.
.भिडे गुरुजी म्हणाले, कुठलीही लढाई ही रणांगणात लढली जात असून आपल्याला शिवाजी महाराजांच्या व संभाजी महाराजांच्या स्वप्नातील हिंदवी स्वराज्य घडवण्यासाठी हिंदू समाजाने उभे राहिले पाहिजे. प्रत्येक गडकिल्ल्यात आपल्याला शिवाजी व संभाजी महाराजांचा सहवास आढळून आला असल्याने त्यांच्या हिंदवी स्वराज्याचे पाईक होण्याची जबाबदारी आपल्या सर्व मराठी बांधवांवर आली आहे. त्याकरिता हे गडकिल्लेच आपलेच श्रीक्षेत्र असून यामाध्यमातून आपण हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पूर्ण करणार असल्याचा आशावाद व्यक्त केला.
युवकांनी मोबाईल, टीव्ही व सोशल मीडियाच्या आहारी न जात शिवचरित्र वाचण्याचे आवाहन केले. आज काल वाचन संस्कृती संपल्याने आपण इतिहास विसरलो आहोत. आजचा तरुण व्यसनाच्या आहारी जात असल्याने त्यांनी चिंता व्यक्त केली. आजच्या तरुणांनी व्यसनाच्या आहारी न जाता व्यायामाची कास धरण्याचे आवाहन केले.
यावेळी शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हा कार्यवाहक अरुणबापू ठाणगे , संतोष भोर, तुषार औटी , संदीप कावरे ,शेखर हांडे, संभाजी मगर, आबा देशमुख, प्रसाद तोटे ,महेश ठुबे ,सतीश म्हस्के, धीरज महांडुळे, रायभान औटी, प्रतीक पाचपुते, पांडुरंग भोसले, अनिकेत शिंदे व अविनाश मरकळे आदी उपस्थित होते