पुणे – बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा पुणे शहरात दरबारचा आज शेवटचा दिवस होता. दरम्यान, आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे येथे जाऊन बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री यांचे दर्शन घेतले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हात जोडून बागेश्वर बाबासमोर लीन झाल्याचे पाहायला मिळाले, तर बागेश्वर बाबा यांनी फडणवीस यांचे कौतुक केले.
यावेळी फडणवीस यांचं कौतुक करताना बागेश्वर बाबा म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री आहेत म्हणून मी त्यांचं कौतुक करत नसून ते एक रामभक्त आहेत. जे राम भक्त असतात ते सर्वांचे असतात तर जे रामभक्त नतात ते कोणाचेही नसतात. त्यानंतर फडणवीस यांनीही बागेश्वर बाबाच्या सनातन धर्मासाठीच्या कामाचे कौतुक केले. बागेश्वर बाबा सनातन धर्मासाठी उत्तम काम करत असल्याचे फडणवीस म्हणाले.
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, बागेश्वर बाबा सनातन धर्माची सेवा करत आहेत. सनातन धर्मासाठी जनजागृती करत आहेत. जर भारताची जागृती झाली तर जगाची जागृती होईल. रामलल्ला जिथे विराजमान होते तिथेच प्रभू रामाचे मंदिर होते आहे आणि 22 जानेवारीच्या दिवशी तिथेच रामलल्लाची प्रतिष्ठापना होते आहे. बागेश्वर बाबा जेव्हा सनातन धर्माची गोष्ट करतात तेव्हा अनेक लोक त्यांना नावं ठेवतात. त्यांचा अपप्रचार करतात. सनातन म्हणजे जातीयवाद, परंपरावाद असे काहीजण म्हणतात. पण त्यांना सनातनचा अर्थच कळलेला नाही. सनातनचा अर्थ म्हणजे जे अनादी आणि अनंत आहे ते सनातन आहे. जो सगळ्यांना एकत्र बांधणारा विश्वास आहे, आपण सगले देवाची लेकरं आहोत या विचाराने सनातन धर्म पुढे जातो आहे. पुण्याचं भाग्य आहे की बागेश्ववर बाबा याठिकाणी आले. त्यांनी रामकथाही सांगितली. जो रामकथा ऐकतो त्याचे आयुष्य सार्थकी लागते असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
बागेश्वर बाबांनी संत तुकाराम महाराज यांचे घेतले दर्शन –
बागेश्वर बाबा यांनी काही दिवसांपूर्वी संत तुकाराम महाराजांना त्यांची पत्नी मारायची असे वादग्रस्त वक्यव्य केले होते. यानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. त्यानंतर त्यांनी आपल्या वक्तव्यावरून यु-टर्न घेत जाहीर माफी मागितली होती. बागेश्वर बाबा यांनी देहू स्थित तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराला भेट दिली. यावेळी त्यांनी मंदिराच्या भव्य बांधकामाचे कौतुक केले. काही दिवसांआधी त्यांनी संत तुकाराम महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. यावर त्यांना आज पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, तुकाराम महाराजांबद्दल तसं माझ्या बाचण्यात आले होते म्हणून मी ते बोललो असं ते म्हणाले. यासाठी मी पुन्हा एकदा समस्त वारकरी सांप्रदायाची माफी मागतो असं बागेश्वर बाबा म्हणाले.
दरम्यान, सध्या पुण्यात दोन दिवसांपासून बागेश्वर बाबाचा दरबार भरला आहे. या दरबारात अनेक राजकीय नेतेही आपली हजेरी लावताना दिसत आहे. आज या दरबारचा शेवटचा दिवस होता. दरम्यान, पुणे शहरतील काही संघटनांनी या दरबारला विरोध दर्शवला होता.