मुंबई – आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीची युती जाहीर झाली आहे. याबाबत वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईत माहिती दिली.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, आमच्यात आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यामध्ये बोलणी झाली असून येणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी एकत्र जाण्याचा निर्णय झाला आहे. पुढच्या निवडणुकीसाठी आम्ही शिवसेना, राष्ट्रवादी आणि काॅंग्रेससोबत जाण्यासाठी तयार आहोत. मात्र काही सुत्रांकडून माहिती मिळाली आहे की, वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत घेण्यास राष्ट्रवादी काॅंग्रेसचा खुला तर काॅंग्रेसचा छुपा विरोध आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काॅंग्रेस शिवसेनेला सोबत घेते का? हे बघावे लागणार आहे.
जागा वाटपाबाबत बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, शिवसेना ठाकरे गटासोबत युतीची चर्चा करण्याआधी आम्ही एकूण 83 जागांवर निवडणूक लठवण्याची तयारी केली होती. मात्र आता शिवसेना ठाकरे गट आणि आमच्या युती झाल्याने चर्चा करून शिवसेना सोडेल तेवढ्या जागेवर आम्ही निवडणुक लढविण्यास तयार आहोत, असेही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. दरम्यान, मागील काही महिन्यांपासून शिवसेना ठाकरे गटा आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये युतीबाबत चर्चा सुरू आहेत. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत एक बैठक पार पाडली होती. त्यानंतर आज प्रकाश आंबेडकर यांनी युतीची घोषणा केली आहे.
पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीत जागा वाटपावरून कोणतेही भांडण नाही. आमचा एकही नेता तपास यंत्रणांच्या रडारखाली नाही. त्यामुळे मला वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना ठाकरे गटाची युती स्थिर दिसते आहे. आता शिवसेना काही कारणास्तव निर्णय घेऊ शकली नाही, तरच मला यामध्ये अडचण वाटते.