छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडून स्वराज्य स्थापनेची प्रेरणा घेऊन बुंदेलखंडात स्वतंत्र हिंदू राज्याची स्थापना करणारे महाराजा छत्रसाल यांचे आज पुण्यस्मरण. त्यांचा जन्म शुक्ल तृतीया शके 1707 (सन 1641) रोजी टिकमगढ जिल्ह्यातील मोराच्या डोंगर परिसरात झाला. त्यांना वयाच्या पाचव्या वर्षांपासूनच युद्धकलेचे धडे देण्यात आले.
छत्रसाल जेव्हा 12 वर्षांचे होते तेव्हा त्यांचे वडील चंपतराय यांना औरंगजेबाच्या सरदारांनी मारले होते व त्यांच्या आईने आत्महत्या केली होती. आई-वडिलांच्या मृत्यूनंतर ते मोठ्या भावाबरोबर देवगडला आपल्या मामाकडे गेले.
कालांतराने ते आपल्या भावासह राजा जयसिंग यांच्याकडे गेले आणि सैन्यात भरती झाले. जयसिंग हा औरंगजेबासाठी काम करत होता, त्यामुळे औरंगजेबाने त्याच्यावर दक्षिण जिंकण्याची जबाबदारी सोपवली तेव्हा छत्रसाल यांना या युद्धात आपले शौर्य दाखवण्याची पहिली संधी मिळाली. छत्रसाल यांनी मे 1665 मध्ये विजापूर युद्धात विलक्षण शौर्य दाखवले आणि देवगडच्या गोंडा राजाचा पराभव करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. पण त्याचे श्रेय इतर सरदारांनी मात्र त्यांना दिले नाही.
पुरंदर किल्ला लढाईच्या वेळी शिकारीचे निमित्त काढून त्यांनी मुघल छावणी सोडली व छत्रपती शिवाजी महाराजांची भेट घेतली. त्यांच्याकडून बुंदेलखंडात स्वतंत्र राज्य स्थापन करण्याची प्रेरणा व योग्य मार्गदर्शन घेतले. छत्रसाल 1671 मध्ये आपल्या मातृभूमीत परतले, छत्रसाल यांचे भाऊ दिल्लीशी लढायला तयार नव्हते. दतिया नरेश शुभंकरन यांनी महाराज औरंगजेबाशी शत्रुत्व न करण्याचा सल्ला दिला. तेव्हा छत्रसाल यांनी लोकाभिमुख होऊन शिवाजी महाराजांच्या गनिमीकाव्याने कामाला सुरुवात केली.
त्यांचा बालमित्र महाबली यांनी वडिलोपार्जित संपत्तीचा काही भाग छत्रसाल यांना दिला व ज्येष्ठ शुद्धपंचमी शके1728 (1671) रोजी 5 घोडेस्वार आणि 25 पायदळांची छोटी फौज तयार केली आणि मुघलांविरुद्ध बंडाचा ध्वज उभारला. महाराज छत्रसाल यांच्या देशभक्ती आणि शौर्यामुळे त्यांना जनतेचा मोठा पाठिंबा मिळाला. अल्पावधीत त्यांनी प्रचंड सैन्य तयार केले. वासियाच्या युद्धानंतर मुघलांनी छत्रसाल बुंदेला “महाराजा’ ही मान्यता दिली होती. त्यानंतर त्यांनी “कालिंजरचा किल्ला’ जिंकला व 1678 मध्ये पन्ना येथे राजधानी स्थापन केली. योगीराज प्राणनाथ यांच्या मार्गदर्शनाखाली विक्रम शके1744 मध्ये त्यांचा राज्याभिषेक झाला. त्यांना आपले राज्य टिकविण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. वर्ष 1683 च्या सुमारास औरंगजेब दक्षिणेत गेला व त्यांच्या मुलांच्या भांडणाचा फायदा छत्रसाल महाराजांना मिळाला.
वर्ष 1729 मध्ये प्रयागच्या सुभेदार महंमद बंगश याने छत्रसालवर हल्ला केला. आसपासच्या संस्थानिकांनी छत्रसाल महाराजांना साथ दिली नाही, तेव्हा छत्रसाल बुंदेलाने बाजीराव पेशव्यांकडे निरोप पाठवला. थोरले बाजीराव पेशवे यांनी योग्य वेळी मदत केली व बंगशचा पराभव केला. त्यामुळे महाराज छत्रसाल यांनी कन्या मस्तानी हिच्या बरोबर विवाह करून दिला व बाजीरावांना बुंदेलखंडातील तिसरा हिस्सा दिला. या विवाहामुळे बुंदेलखंडाशी महाराष्ट्राचे नाते जोडले गेले.
20 डिसेंबर 1731 रोजी महाराजा छत्रसाल यांचे निधन झाले. धुबेला येथे महाराजा छत्रसाल यांची समाधी पेशवे बाजीराव यांनी बांधली.