मुंबई : सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडून महापुरुषांबद्दल झालेली अवमानकारक विधाने, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद, परराज्यात गेलेले उद्योग, वाढती महागाई, बेरोजगारी आणि राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची विरोधी पक्षाची मागणी अशा अनेक मुद्यांमुळे नागपूर येथे होऊ घातलेले राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. हे अधिवेशन सत्ताधारी पक्षासाठी कसोटीचे ठरणार आहे. विरोधी पक्ष महाविकास आघाडीने शनिवारी मुंबईत अभूतपूर्व मोर्चा काढून अधिवेशनात आक्रमक होण्याचे संकेत दिले आहेत. सरकारविरोधात दोन हात करण्याचा विरोधी पक्षांचा निर्धार पाहता विरोधकांकडून रविवारच्या मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर बहिष्कार टाकला आहे.
करोना संसर्गामुळे सलग दोन वर्षे नागपूरला राज्य विधिमंडळाचे अधिवेशन होऊ शकले नाही. आता करोनाची साथ नियंत्रणात आल्याने नागपूर अधिवेशनासाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षाकडून जोरदार तयारी सुरू आहे. अधिवेशनाची तयारी पूर्ण झाली असून अधिवेशनानिमित्त येणारे मंत्री, आमदार, अधिकारी यांच्या स्वागतासाठी संत्रानगरी सज्ज झाली आहे. पोलीस प्रशासनाने विधान मंडळ परिसरात चोख बंदोबस्त ठेवला आहे.
चहापानावर विरोधकांचा बहिष्कार
राज्यविधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन उद्यापासून नागपूरमध्ये सुरु होत आहे. या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना चहापान कार्यक्रमासाठी आमंत्रित केले होते. मात्र विरोधकांनी सत्ताधाऱ्यांच्या चहापान कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. यासंदर्भात विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार म्हणाले, महापुरुषांचा अपमान, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद, शेतकऱ्यांचे प्रश्न अशा अनेक प्रश्नांवरून विरोधी पक्षांनी मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनाच्या पुर्वसंध्येला आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
नक्षलवाद्यांचा इशारा
हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरात पोलिसांचा बंदोबस्त कडक करण्यात आला आहे. तर दुसरीकडे नक्षल्यांनी सरकारला इशारा दिला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड लोह खनिज खाणीचा विस्तार त्वरित रद्द करण्यात यावा, असा इशारा नक्षलवाद्यांनी राज्य सरकारला दिला आहे. जर सरकार सुरजागड लोह खनिज खाणीचा विस्तार रद्द करणार नसेल तर आदिवासींचे हित पाहणाऱ्या सर्व घटकांनी एकत्रित येऊन सरकार विरोधात जनसंघर्ष उभारावा, असे आवाहनही नक्षलवाद्यांनी प्रसिद्ध पत्रकातून केले आहे. हे पत्रक बंदी घालण्यात आलेल्या भारतीय कम्युनिस्ट पार्टी माओवादीच्या पश्चिम सब जोनल ब्यूरोने आज हे प्रसिद्ध केले आहे.
शिंदे-ठाकरेंमध्ये होणार खडाजंगी
विधानपरिषद निवडणुकांनंतर शिवसेनेमध्ये भूकंप झाला. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपद सोडल्याने महाविकास आघाडी सरकार कोसळले. यामुळे शिवसेनेतील बंडानंतर अधिवेशनात पहिल्यांदाच ठाकरे विरुद्ध शिंदे असा सामना पाहायला मिळणार आहे. उद्धव ठाकरे हे विधानपरिषदेचे सदस्य आहेत. दरम्यान, एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांनी मागच्या 6 महिन्यांमध्ये वेगवेगळ्या व्यासपीठावरून एकमेकांवर हल्ले-प्रतिहल्ले केले. पण आता विधानपरिषदेमध्ये या दोघांमध्ये समोरासमोर खडाजंगी होणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
राज्यातील अनेक प्रकल्प राज्याबाहेर गेले आहेत. लाखो कोटीची गुंतवणूक होणार होती. मात्र या सगळ्या गोष्टींना महाराष्ट्र मुकला आहे. विरोधाला विरोध करणारे आम्ही नाहीत. आम्ही चर्चेतून मार्ग काढणारी लोकं आहोत. आम्ही आमदाराचा निधी वाढवला होता. आता सरकारमध्ये हिंमत असेल तर त्यांनी 7 कोटी निधी करावा.
– अजित पवार, विरोधी पक्षनेते
या मुद्द्यांवर गाजणार अधिवेशन
* छत्रपती शिवाजी महाराज आणि महापुरुषांबद्दल सत्ताधारी नेत्यांकडून वादग्रस्त वक्तव्य
* महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद
* राज्यातील मोठे उद्योग परराज्यात स्थलांतरित
* लेखक कोबाद गांधी यांच्या पुस्तकाला
* जाहीर झालेला पुरस्कार रद्द
* शिंदे गटातील आमदारांच्या संरक्षणासाठी पोलिसांच्या निर्भया पथकातील वाहनांचा वापर
* वसईतील श्रद्धा वालकर हत्याकांड