पुणे – शाई फेकण्यापेक्षा ती शाई साठवून महापुरुषांचा अवमान करणारी विचारधारा मतदानातून पराभूत करू, असे आवाहन शिवसेनाच्या (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केले. तसेच भविष्यात महापुरुषांचा अवमान झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन उभारण्याचा इशाराही अंधारे यांनी दिला. भगतसिंग कोश्यारी यांना आपण राज्यपाल असल्याचा विसर पडला असून ते पूर्णवेळ भाजपचे कार्यकर्ते असल्यासारखे वागत असल्याचा आरोप अंधारे यांनी केला.
डेक्कन येथून निघालेल्या मूक मोर्चाचे रूपांतर लालमहालाजवळ विराट सभेत झाले. त्या वेळी अंधारे बोलत होत्या. यावेळी अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, राम कदम, मंगलप्रसाद लोढा, प्रसाद लोढा, निलेश आणि नितेश राणे यांचा समाचार घेतला.
यावेळी अंधारे म्हणाल्या की, महापुरुषांबद्दल देवेंद्र फडणवीस यांच्या मनात आदर असता तर त्यांच्या पक्षाकडून होत असलेली अवमानकारक भाषा तत्काळ थांबविली असती. पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या अनुद्गागाराच्या वेळी फडणवीस हिरीरिने माध्यमांसमोर येतात. लगबगीने प्रतिक्रिया देतात. मात्र, महापुरुषांचा अवमान राज्यात होत असताना ते चकार शब्दही बोलत नाहीत. अशी बेताल वक्तव्य करणाऱ्या आमदरांचे निलंबनही ते करत नाहीत. राज्यपाल परत बोलवा असे पत्र ते केंद्राला लिहीत नाहीत. भाजप किती दुटप्पीने वागतो, याची ही सर्व उदाहरणे आहेत.
यावेळी अंधारे यांनी शिंदे -फडणवीस सरकारमधील मंत्र्यांवरसुध्दा निशाणा साधला. त्या म्हणाल्या की, भाजपचे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचे प्रेम हे बेगडी आहे. त्यांना ा सन्मानापेक्षा खुर्ची महत्त्वाची वाटत आहे. त्यांच्या खुर्च्या हिसकावल्या पाहिजेत, आपण हे आंदोलन ताकदीने पुढे न्यायचे आहे.
दरम्यान, डेक्कन येथे सकाळी छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार करून मुक मोर्च्यास सुरुवात झाली. डेक्कन ते लाल महाल या संपूर्ण मोर्चात खासदार उद्यनराजे भोसले सहभागी झाले. लाल महाल येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास त्यांनी अभिवादन केले. मात्र समारोप सभेत मात्र ते उपस्थित राहिले नाही. खासदार उदयनराजे भोसले यांचे विचार आपल्याला ऐकायला मिळतील. मात्र ते मंचावर आले नाहीत. महापुरुषांचा अवमान त्यांना सहन न झाल्याने ते तडकाफडकी राजीनामा द्यायला दिल्लीला गेले का? असा सवाल अंधारे यांनी केला.