– शिवशंकर निरगुडे
हिंगोली – परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील आडगाव तांडा येथील शेतकरी कुटुंबातील कोमल चव्हाण हिची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 2021 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये मंत्रालयातील सहाय्यक विभागीय अधिकारी म्हणून निवड झाली आहे. तिच्या या निवडीचे तालुक्यात सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.
जिंतूर तालुक्यातील आडगाव तांडा येथील एका सामान्य शेतकरी कुटुंबातील विजय चव्हान यांची मुलगी कोमल चव्हाण हिची लहानपणापासूनच अधिकारी होण्याची मोठी इच्छा होती. बालपणापासून अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोमलने अतिशय जिद्दीने अभ्यास केला, आणि आपले स्वप्न सत्यात उतरवले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 2021 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये तिची मंत्रालयातील सहाय्यक विभागीय अधिकारी म्हणून निवड झाली आहे.
कोमलचे प्राथमिक शिक्षण हे तालुक्यातील आडगाव येथे झाले. त्यानंतर पदवीपर्यंतचे शिक्षण जिंतूर शहरात झाले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या तयारीसाठी तिने पुणे, मुंबई सारख्या मोठ्या शहरात न जाता परभणीत राहूनच तिने परीक्षेची तयारी केली. जिद्द व चिकाटीच्या जोरावर तिने आपले बालपणीचे स्वप्न पूर्ण केले. एका सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पास झाल्याने तिचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
दरम्यान, आपल्या यशाबद्दल प्रसारमाध्यमांशी बोलताना कोमल म्हणाली की, “मला जन्म माझ्या आई- वडीलांनी दिला परंतु माझ्या शिक्षणासाठी मेहनत घेऊन मला वेळोवेळी प्रेरणा देणारे माझे मोठे काका राजू चव्हाण आणि काकू मालु चव्हाण यांचा देखील या यशामध्ये खुप मोठा वाटा आहे. असे कोमल चव्हाण हिने सांगितले.