भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन. या दिनाचे औचित्य साधून त्यांनी महिला उद्धारासाठी केलेल्या कार्याचा आढावा…
प्राचीनकाळी स्त्रीप्रधान जीवन भारतापासून इजिप्तपर्यंत प्रचलित होते. कालांतराने नागवंशामध्ये ही प्रथा रूढ झाली. बौद्ध धम्मामध्ये स्त्रियांना शिक्षण दिले. संघामध्ये प्रवेश दिला, दीक्षा दिली, आदर्श जीवन पद्धतीचा पायंडा पडला जात होता. रोमन साम्राज्यात स्त्रीला प्रतिष्ठेचं स्थान होतं तिला पुरुषाची मैत्रीण मानली गेली होती. “स्त्री व पुरुषाच्या स्वभावामध्ये फरक नसतो’ असे प्लेटो सांगतो. ऍरिस्टॉटलनेही स्त्रीला नाकारले नाही. प्रेषित महंमद पुरुषांना म्हणाले होते, “तुमचा स्त्रियांवर अधिकार आहे तसाच त्यांचाही तुमच्यावर अधिकार आहे.’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर “द राइज अँड फॉल ऑफ हिंदू वूमेन’ या पुस्तकामध्ये म्हणतात, “ज्या देशात महिला सुखी तो देश सुखी.’ हे विधान आजच्या जगामध्येसुद्धा प्रगतशील प्रत्येक राष्ट्राला लागू पडते.
महिलांचे सुख हे जपताना स्त्रियांना मनानेसुद्धा जपले पाहिजे. कारण महिलांच्या सुखावर देशाचे सुख अवलंबून आहे, असे डॉ. बाबासाहेबांचे मत आहे. तर स्त्रियांचा सर्वांगीण विकास, समता, स्वातंत्र्य अशा अंगाने विचार केल्यास सुख कायम टिकून राहू शकेल. स्त्री-पुरुष समानतेसाठी त्यांनी स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतर सामाजिक स्तरीय घटना व कायद्याच्या माध्यमातून प्रयत्न केले. रमाबाई आंबेडकर (स्वत:च्या पत्नीस) लिहिलेल्या पत्रामध्ये डॉ. आंबेडकर म्हणतात, “मी स्त्रीमुक्तीसाठी व उन्नतीसाठी लढणारा एक योद्धा आहे. स्त्रियांची प्रतिष्ठा वाढविण्यासाठी आवश्यक जो संघर्ष केला त्याचा मला सार्थ अभिमान आहे.’ यावरून डॉ. आंबेडकरांची स्त्रीविषयक भूमिका स्पष्ट होते. कुटुंब हे हिंदू समाजाचे युनिट आहे हे आंबेडकरांनी मान्य न करता तो वर्ग आहे असे म्हटले.
कुटुंबप्रमुखाची हुकूमशाही, स्त्रियांची गुलामगिरी हाच सामाजिक विषमतेला, गुलामगिरीला खतपाणी देणारा आधार आहे. म्हणून या आधारालाच हादरे दिले तरच कुटुंबात पर्यायाने समाजात स्त्री-पुरुष समानता येईल, हे डॉ. आंबेडकरांना माहीत होते. त्यांच्यावर कबीर, बुद्ध, फुले, शाहू यांच्या महिलाविषयक विचारांचा प्रभाव होता म्हणून त्यांनी त्यांच्या विचारांचा अभ्यास केला जागतिक माहिलांविषयक प्रश्नांचा अतिशय सूक्ष्मपणे अभ्यास केला. विदेशातील त्यांच्या निवासाच्या काळात “पाश्चात्य स्त्रियांच्या व भारतीय स्त्रियांच्या स्थितीची तुलना त्यांच्या मनात नकळत होत असावी आणि माझ्याही देशातील स्त्री मुक्त असावी, प्रगत असावी, सुशिक्षित असावी’ हा विचार नकळतपणे डॉ. आंबेडकरांच्या मनात कोरला गेला असेल.
राष्ट्रीय दृष्टिकोनातून डॉ. आंबेडकरांनी विचार करून “भारतातील जाती’, “हिंदू स्त्रियांची उन्नती व अवनती’, थॉट्स ऑन पाकिस्तान’, “भगवान बुद्ध आणि धम्म’ या ग्रंथामधून स्त्रियांच्या उद्धारासाठी लेखन केले. हिंदू स्त्रियांच्या गुलामगिरीची कारणे शोधली शिवाय मुस्लीम स्त्रियांची पडदापद्धत, धर्मांतर कायदेशीर हक्क इत्यादी अनेक प्रश्नांची उत्तरे शोधत डॉ. आंबेडकरांनी “सेक्युलर’ दृष्टिकोन मांडला. यातून त्यांनी समग्र स्त्रियांच्या प्रश्नांच्या मांडणीसाठी लेखन केल्याचे दिसते. महात्मा फुले यांनी “अक्षर ओळख करून नंतर विचारांनी परिवर्तन झाल्यास स्त्रियांमध्ये दुर्बलता राहणार नाही. स्वावलंबी होऊन रोजगारासाठी पात्र होईल’, हा विचार कृतीत आणला. दलित स्त्रीच्या मुक्ती चळवळीची आद्यप्रणेती “मुक्ताबाई साळवे’ जिच्या लेखनातून संघर्ष समोर आला. स्त्रीमुक्तीचा विचार महात्मा फुले, लोकहितवादी, सुधारक आगरकर, न्यायमूर्ती रानडे, महर्षी
कर्वेंपासून डॉ. आंबेडकरांपर्यंत एक सेतूप्रमाणे चालत आला. डॉ. आंबेडकरांनी महात्मा फुले यांच्या विचारांना पुढे नेत “स्त्रिया संघटनेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहेत’ असा त्यांचा विश्वास होता. सामाजिक सुधारणेच्या प्रक्रियेमध्ये स्त्रियांचा सहभाग असलाच पाहिजे. त्यांच्यामध्ये आत्मविश्वास प्रचंड असतो म्हणून त्यांच्यावर जबाबदारी देण्याच्या दृष्टीने डॉ. आंबेडकरांनी सभा, संमेलनांमधून, भाषणांमधून, लेखनांमधून स्त्रियांमध्ये बदल करण्याचे महत्त्वाचे कार्य केले.
डॉ. आंबेडकरांच्या भाषणांची वैशिष्ट्ये म्हणजे ते स्वत: प्रत्येक भाषण लिहून तयारी करत. त्या भाषणांची वा लेखांची पुस्तकेही प्रसिद्ध झाली. अग्रलेखात प्रसिद्ध होणारी भाषणेसुद्धा ते आधी लिहीत त्यामुळे वक्तृत्वाचा गुण असला तरी निबंधाचा दर्जा प्राप्त होई. डॉ. आंबेडकरांच्या स्त्रीविषयक लेखनामध्ये भूतकालीन, वर्तमानकालीन, भविष्यकालीन स्त्रियांच्या समस्या, स्थिती, समस्यांवर पर्याय या संबंधाने विवेचन मार्मिक आणि भेदक आहे. या चिंतनातूनच दुर्बल स्त्रीला सक्षम स्त्री निर्माण करता आली. त्या कालखंडातील व्यवस्थेचा विचार करता अशक्य ते शक्य करण्याचा त्यांचा प्रयत्न सफल झाला. स्त्रियांना सन्मानाचा दर्जा मिळू लागला.
डॉ. आंबेडकर अनेक भाषणांमध्ये परिवर्तन व्हावे म्हणून उपदेश देत. संसार, शिक्षण, कर्तव्ये आणि सामाजिक बांधिलकी महिलांमध्ये रूजलेली यामुळे पाहायला मिळते. महिलांमध्ये भीमजयंतीद्वारे होणारे प्रबोधन कौतुकास्पद आहे. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती नावीन्यपूर्ण अंगाने साजरी केली जाते. डॉ. आंबेडकरांच्या विचारांमुळे प्रेरित होऊन नेतृत्व, कर्तृत्व संपन्न महिलांची पिढी तयार होऊ लागली. जयंतीमध्ये स्त्रियांचा सहभाग लक्षवेधी ठरतो. अनेकजणी डॉ. आंबेडकरांच्या जीवनावर, राजकीय, सामाजिक भाषणे करतात. त्यांचे कार्य स्त्री वर्गाच्या उद्धारासाठी परिवर्तनशील व प्रबोधनात्मक आहे. या महामानवाला अभिप्रेत समाज अर्थातच भारत तयार व्हावा, हेच खरे अभिवादन ठरेल.