मराठी गायक, नाट्य-चित्रपट अभिनेते, नाट्यनिर्माते, गंधर्वभूषण जयराम शिलेदार यांचा आज जन्मदिन. त्यांचा जन्म 6 डिसेंबर 1916 रोजी शहापूर बेळगाव येथे झाला. त्यावेळी मराठी रंगभूमी बहरात होती. लहानपणापासूनच त्यांना नाटकाचे आकर्षण होते. ते 16 वर्षांचे असताना त्यांनी रंगमंचावर प्रवेश केला.
अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी सुरू केलेल्या संगीत नाटकांना, नटसम्राट बालगंधर्व, संगीतसूर्य केशवराव भोसले, मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्यामुळे सुवर्णयुग चालू होते. संगीत रंगभूमीने संगीत रसिकांना झपाटून टाकले होते. त्यांनी वर्ष 1932 मधे रघुवीर सावकार यांच्या नाट्य मंडळीत प्रवेश केला. कागलकरबुवा व निळकंठराव चिखलीकर यांच्याकडे त्यांनी गायनातले प्राथमिक धडे घेतले. परंतु रघुवीर सावकार हे गाण्यातील त्यांचे पहिले गुरू. स्त्रीवेशात नमनाचे गाणे म्हणून “संशयकल्लोळ’ नाटकापासून त्यांनी आपल्या नाट्यजीवनाचा श्रीगणेशा केला.
त्याचवेळी बोलपटांचा बोलबाला सुरू झाला व त्यामुळे रंगभूमीवर सावंत येऊ लागले. वर्ष 1947 मधे राम जोशी यांच्या जीवनावर आधारित “लोकशाहीर राम जोशी’ हा चित्रपट व्ही. शांताराम आणि बाबूराव पेंटर यांनी दिग्दर्शित केला. या चित्रपटाची पटकथा ग. दि. माडगूळकर यांची होती तर जयराम शिलेदार यांच्याबरोबर, हंसा वाडकर, शकुंतला, परशुराम, ग. दि. माडगूळकर, सुधा आपटे, सामंत, वालावलकर, जयराम देसाई, कानसे, सावळाराम यांनीही भूमिका केल्या होत्या. या चित्रपटामध्ये जयराम शिलेदार यांनी राम जोशी यांची तर हंसा वाडकर यांनी बयाची भूमिका वठविली होती. या चित्रपटातील पाचही गाणी जयराम यांनी गायली होती, तर संगीत वसंत देसाई यांचे होते. या चित्रपटास प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला व जयराम शिलेदार यांचे नाव चंदेरी दुनियेतही घेतले जाऊ लागले. “जीवाचा सखा’ या चित्रपटातील त्यांची भूमिकाही विशेष गाजली.
वर्ष 1949 मध्ये दसऱ्याच्या मुहुर्तावर “मराठी रंगभूमी’ या स्वतःच्या नाट्य संस्थेचा प्रारंभ केला. परंतु काही अडचणींमुळे संस्था बंद पडली. जयराम यांनी आलेल्या अडचणींचा अभ्यास करून पुन्हा 5 ऑगस्ट 1953 रोजी नव्या जोमाने “मराठी रंगभूमीची’ सुरुवात केली. भरदार देहयष्टी व रंगभूमीला हवा तसा तेजस्वी आवाज या दोन दैवी देणग्या शिलेदारांना लाभल्या होत्या. या सर्व अभिनयाच्या प्रवासात त्यांना त्यांच्या पत्नीची अर्थात जयमाला शिलेदार यांची मोलाची साथ मिळाली.
वर्ष 1947 मध्ये डॉ. भालेराव यांच्या नाट्यमहोत्सवातील “धरणीधर’ या नाटकामध्ये त्यांनी जयराम शिलेदार यांच्यासमवेत जयमाला यांनी पहिल्यांदा काम केले. तर “शाकुंतल’ नाटकामध्येही त्या जयराम यांच्या नायिका होत्या. 10 ऑक्टोबर 1949 रोजी जयराम शिलेदार, नारायणराव जाधव आणि प्रमिला जाधव यांनी मराठी रंगभूमी संस्थेची स्थापना केली. 23 जानेवारी 1950 रोजी जयराम शिलेदार प्रमिला जाधव यांच्याशी विवाहबद्ध होऊन त्या जयमाला शिलेदार झाल्या. जयमाला आणि जयराम शिलेदार यांनी अक्षरशः संगीत नाटकांमध्ये प्राण ओतले. चित्रपट युगात संगीत रंगभूमीचा प्रेक्षकवर्ग त्यांनी पुन्हा खेचून आणला.
“मराठी रंगभूमी’ ही संगीतनाट्य संस्था स्थापन करून त्यांनी अनेक कलाकारांना घडविले. त्यांनी आपल्या कारकिर्दीत सुमारे 32 नाटके रंगमंचावर आणली. आपल्या कलेचा वारसा आपल्या कन्या लता व कीर्ती शिलेदार यांना सोपवून रंगभूमीवरून निवृत्त झाले. 6 नोव्हेंबर 1996 रोजी त्यांचे निधन झाले.