नगर – वाळू व गौण खनिजाअभावी जिल्ह्यात कुठेही विकासकामे ठप्प नाहीत. त्यामुळे या मुद्द्यावर आंदोलनाचे जे इशारे दिले जात आहेत. त्यांचेच बेकायदा उत्खनन व माफियांबरोबर असणारे आर्थिक हितसंबंध आता उघड होत आहेत. आता त्यांचे उत्पन्नाचे मार्ग बंद होत आहेत. म्हणून ते आता आंदोलनाचे इशारे देत आहेत, अशा शब्दांत महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारांकडून दिल्या जात असलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्यांवर टीका केली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठक व नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेतल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या लोकप्रतिनिधींचे नाव न घेता जोरदार टीका केली. वाळू व गौण खनिजाअभावी विकासकामे ठप्प होत असल्याचा आरोप करत आंदोलनाचा इशारा राष्ट्रवादीच्या आमदारांनी दिला होता. याबाबत विचारले असता मंत्री विखे म्हणाले, की जिल्ह्यात कुठेही विकासकामे ठप्प नाहीत. त्यामुळे जे आंदोलनांचे इशारे दिले जात आहेत. ते फक्त त्यांचे आर्थिक हितसंबंध बाधित होत असल्याने दिले जात आहेत. जनतेसाठी नाही. स्वतःचे उत्पन्नाचे साधन बंद होत असल्याचे शल्य त्यांना आहे.
कल्याण विशाखापट्टणम महामार्गाच्या कामासाठी आमदार नीलेश लंके यांनी उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. यावर मंत्री विखे म्हणाले, की महामार्ग किंवा कोणतेही सरकारी काम असो केवळ वाळू नाही, खडी नाही म्हणून काम बंद पडणार नाही. महामार्गाच्या कामासाठी ज्या ठिकाणी खाणपट्टे पाहिजे असतील. त्यासाठी प्रांताधिकाऱ्यांबरोबर चर्चा करा व अधिकृत परवाना घ्या. त्यासाठी प्रमाण निश्चित करा त्यानंतर क्षेत्रीय पातळीवरच परवानगी मिळेल, अशा स्पष्ट सूचना अधीक्षक अभियंत्यांना दिल्या आहेत. असे असताना नौटंकी व स्टंटबाजी करण्यात काही लोकांचा हातखंडा आहे. त्यावर भाष्य करण्याची जास्त गरज वाटत नाही. सर्व कामे आता नियमातच होतील. याआधी जे बेकायदेशीर कामे सुरू होती ते आता होणार नाही. या सरकारकडून फक्त जनतेच्या हिताचे निर्णय घेतले जातील.
कृषी विभागाचे अपयश
पिक विम्या पासून शेतकरी दूर जाणे हे चित्र चिंताजनक आहे.तालुक्यातील शेतकरी संख्या आणि पीक विमा योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येतील तफावत खूप मोठी असल्याने कृषी विभागाला विमा योजनेच्यासंदर्भात प्रभावी काम करावे लागेल. सरकारी प्रकल्पांना गौण खनिजांची कोणतीही अडचण येणार नाही यासाठी संबधित विभागांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्या. त्यानंतर मंत्री विखे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जनता दरबारचे आयोजन केले होते. जिल्ह्यातील सर्वसामान्य व्यक्तींची प्रत्यक्ष भेट घेत त्यांची निवेदने स्वीकारत त्यांच्या असलेल्या अडी-अडचणी, असलेले प्रश्न ऐकून घेत त्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
माध्यमांशी बोलण्याची फॅशन
राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटून विकासकामे बंद पाडली जात असल्याचा आरोप आ. रोहित पवार यांनी केला होता. याबाबत विचारले असता विखे पाटील म्हणाले, की ते कोणत्या मुद्द्यावर बोलले आहेत हे माहित नाही. मात्र, आता प्रसिद्धीसाठी प्रसारमाध्यमांशी बोलण्याची फॅशन झाली आहे. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याला जास्त किंमत देण्याची गरज नाही.