अमरावती – लग्न सोहळ्यावरून पतताना एसटी बसची कारला धडक बसून भीषण अपघात झाला आहे. रविवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास अमरावती-यवतमाळ मार्गावरील नेर जवळील लोणी गावाजवळ हा भीषण अपघात झाला. अपघातात चौघांचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी आहेत. जखमींवर यवतमाळच्या जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
राधेश्याम इंगोले (रा. यवतमाळ ), रजनी इंगोले (रा. यवतमाळ ), वैष्णवी गावंडे ( रा. वाशिम ) आणि सारीका चौधरी ( रा. पुसद यवतमाळ ) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. तर साक्षी प्रमोद चौधरी ( रा. पुसद ), प्रमोद पांडुरंग चौधरी, सारीका संतोष गावंडे आणि संतोष गावडे अशी जखमींची नावे आहेत.
गावंडे, चौधरी आणि इंगोले कुटुंबीयांच्या नातेवाईकांचे 3 डिसेंबर रोजी अमरावतीमधील नांदगाव खंडेश्वर येथे लग्न होते. हा लग्नसोहळा आटोपून ते यवतमाळकडे परत येत होते. यावेळी विरुद्ध दिशेने जात असलेल्या एसटी बसने कारला समोरून जोरदार धडक दिली.
हा अपघात एवढा भीषण होता की, यामध्ये वाहनातील तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर, चार जण गंभीर जखमी झाले आहेत. यातील तिघांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना नागपूर येथे हलवण्यात आले आहे. भीषण अपघातात चौघांचा मृत्यू झाल्याने कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.