मुंबई – “द कश्मीर फाइल्स’ या सिनेमाची सध्या चांगलीच चर्चा आहे. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला असून, प्रेक्षकांच्या मनात आणि बॉक्स ऑफिसवर सिनेमाने अधिराज्य गाजवले आहे. काश्मिरी पंडितांच्या स्थलांतरावर भाष्य करणारा हा सिनेमा आहे. मात्र, आता पुन्हा एकदा या सिनेमाची चर्चा होताना दिसून येत आहे.
नुकतंच गोव्यात 53वा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल सुरु होता यावेळी अनेक दिग्गजांच्या उपस्थितीमध्ये इफ्फी पुरस्काराचं वितरण होतं. तसेच अनेक सिनेमाचं स्क्रिनिंग केलं जातं होत. अश्यातच, ज्यूरी हेड आणि इस्रायली सिनेमांचे निर्माते नादव लॅपिड यांनी मनोगत व्यक्त करताना काश्मीर फाइल्स सिनेमावर चांगलाच निशाणा साधला आहे. या संदर्भातील त्यांचा एक व्हिडिओ देखील सोशलवर व्हायरल होत आहे.
ते म्हणाले, “इफ्फी महोत्सवातील 15वा सिनेमा होता द काश्मीर फाईल्स . पण हा सिनेमा पाहिल्यानंतर आम्हाला धक्का बसला. आम्ही सगळे अस्वस्थ झालो. हा सिनेमा एका विशिष्ट प्रोपगंडा असलेला आणि वल्गर आहे. इफ्फी सारख्या प्रतिष्ठित महोत्सवात काश्मीर फाईल्स सारख्या सिनेमाला स्थान मिळालं हे अयोग्य आहे’.
दरम्यान, नादव लॅपिड यांच्या या विधानानंतर आता स्वतः ‘द काश्मीर फाइल्स’ या सिनेमाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी या प्रकरणावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच, आपण लवकरच “The Kashmir Files: Unreported’ प्रदर्शित करणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे. एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत ते बोलत होते.
दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री म्हणाले की, “आमच्याकडे अशा अनेक गोष्टी आणि किस्से आहेत ज्यावरुन आम्ही एक नाही तर 10 चित्रपट बनवू शकत होतो. पण मला एकच चित्रपट बनवायचा होता. पण आता ‘The Kashmir Files: Unreported’ च्या माध्यमातून मी सर्व सत्य समोर आणणार आहे’.
नादव लॅपिड यांच्या टीकेबाबत विवेक अग्निहोत्री काय म्हणतात…
त्यांनी म्हंटल की., “कोणत्याही हुशार व्यक्ती किंवा महान दिग्दर्शकाने काश्मीर फाइल्समधील एखादा सीन किंवा संवाद खरा नसल्याचं सिद्ध केलं तर मी चित्रपट बनवणं थांबवेन. जोपर्यंत कोणीही मला खोटं सिद्ध करु शकत नाही, तोपर्यंत मी चित्रपटांच्या माध्यमातून गोष्टी सांगणार’. असं देखील ते यावेळी म्हणाले.