मुंबई :– पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात सहभागी असल्याचा ठपका असलेले ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांच्या जामीनाविरोधात दाखल केलेली याचिका ईडीने आज स्वतःहून माघारी घेतली आहे. या याचिकेवर सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. यामुळे राऊतांचा जामीन रद्द करण्याच्या ईडीच्या प्रयत्नांना खीळ बसली आहे.
गोरेगावच्या पत्रा चाळ पुनर्विकास घोटाळ्यातील पैशांचा गैरवापर केल्याचा संजय राऊत यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणी 9 डिसेंबरला पीएमएलए न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला होता. या जामिनाला स्थगिती मिळावी, यासाठी ईडीने तात्काळ मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. परंतु, तेव्हादेखील उच्च न्यायालयाने याप्रकरणाची तातडीची सुनावणी करण्याची मागणी फेटाळून लावली होती.
या सगळ्यानंतर ईडीकडून विशेष न्यायालयाने संजय राऊत यांना जामीन देताना केलेल्या टिप्पणीच्या अनुषंगाने आपल्या याचिकेत काही बदल केले होते. त्यानंतर ईडीने संजय राऊतांचा जामीन रद्द करण्यासाठी पुन्हा उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. या याचिकेवर शुक्रवारी न्यायमूर्ती एम.एस. कर्णिक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणे अपेक्षित होते.
परंतु, न्यायमूर्ती कर्णिक यांच्या खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी करण्यास नकार दिला. त्यामुळे आता ईडीला आता उच्च न्यायालयाच्या दुसऱ्या खंडपीठासमोर नव्याने याचिका दाखल करावी लागले. परिणामी संजय राऊत यांना आणखी काही दिवस दिलासा मिळाला आहे.