भारतात गेल्या अनेक वर्षांपासून क्रिकेट खेळाचा दबदबा राहिला आहे. याच क्रिकेटने अनेक प्रतिभावान खेळाडूंना जगासमोर आणले. गरिबीवर मत करत यश मिळवणाऱ्या अशाच एका महिला क्रिकेटपटूंबाबत आपण ओळख करणार आहोत. या महिला क्रिकेटपटूच नाव अर्चना देवी असं आहे. अर्चना लहान असताना तिच्या वडिलांचे निधन झाले. घरातील कमावता व्यक्ती गेल्याने अभ्यासासाठी पैसे नव्हते. क्रिकेटची प्रचंड आवड होती, मात्र शिकवणारं कोणी नव्हतं, क्रिकेटची किट तर सोडा, तिच्याकडे बॅट घेण्यासाठीही पैसे नव्हते. मात्र अर्चनाकडे क्रिकेट खेळण्याची जिद्द आणि मेहनत घेण्याची तयारीही होती.
अर्चना उत्तर प्रदेशमधील उन्नावच्या रताई येथील राहणारी आहे. अर्चनाला तिच्या मेहनतीचे फळ मिळाले आणि तिची भारताच्या १९ वर्ष वयोगटातील महिला क्रिकेट संघात निवड झाली. २७ नोव्हेंबर पासून मुंबईत सुरु होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या ५ सामान्यांच्या टी-२० मालिकेसाठी अर्चनाला संघात स्थान मिळाले आहे. उत्तर प्रदेशच्या अर्चनाचे वय १८ वर्ष असून ती फलंदाजीसह ऑफ-स्पिन गोलंदाजी करते. महत्वाचं म्हणजे सुरुवातीला अर्चनाला क्रिकेट खेळाबाबत कोणतीही माहिती नव्हती आणि तिला या खेळाची आवडही नव्हती.
वडील आणि भावाला गमावले
मात्र, अर्चनाच्या मनात क्रिकेटविषयी आवड निर्माण झाली. त्याचबरोबर तिने या खेळासाठी जिद्दीने मेहनत घेतली. इतर खेळाडुंच्या तुलनेत अर्चनाच्या कुटुंबाची परिस्थिती पहिली तर अत्यंत हलाखीची होती. अर्चनाने लहापणीच तिच्या वडिलांना गमावले होते. त्यानंतर २०१७ मध्ये अर्चनाच्या लहान भावाचाही सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू झाला. यांनतर तिच्या संपूर्ण कुटुंबाला मानसिक हादरा बसला होता.
अर्चनाचे शिक्षण आणि क्रिकेट
अर्चनाने उन्नाव येथील कस्तुरबा गांधी शाळेत सुरुवातीचे शिक्षण घेतले. तीला खेळाची पहिल्यापासूनच आवड होती, एकदा शाळेत झालेल्या धावण्याच्या शर्यतीत तिने दुसरे स्थान पटकावले होते. त्यानंतर तिथल्या क्रीडा शिक्षिका पूनम गुप्ता यांनी अर्चनाच्या क्रीडा कौशल्याला ओळखले आणि त्या तिला घेऊन कानपूरला आल्या. तिथे अर्चनाकडे क्रिकेट खेळण्यासाठी लागणाऱ्या किटसाठीही पैसे नव्हते. अशा परिस्थितीत तिला शिक्षिका पूनम गुप्ता यांनीच किट मिळवून दिली. कानपूर क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष आणि भारतीय बुद्धिबळ फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष संजय कपूर,लखनऊचे उद्योगपती सुकांत बॅनर्जी आणि प्रशिक्षक कपिल देव पांडे यांनी अर्चनाला सर्व प्रकारची मदत केली.
संघात निवड झाल्यानंतर अर्चना म्हणाली
“पूनम मॅडम यांनी मला कानपूरला घेऊन आल्या आणि सुरुवातीला माजी हॉस्टेलमध्ये राहण्याची व्यवस्था केली. माझ्या शाळेची फीही पूनम मॅडमनेच भरली. त्यानंतर मी रोव्हर ग्राउंडवर आले तर तिथे कपिल सर, रीटा डी मॅम, सुकांत सर आणि संजय कपूर सरांनी मला खूप मदत केली. हे लोक माझ्यासोबत नसते तर कदाचित मी क्रिकेट खेळू शकलो नसते. मी २०१७ पासून कपिल सरांकडे क्रिकेटचे प्रशिक्षण घेत आहे. महत्वाचं म्हणजे त्यांनी माझ्याकडून कधीही एक पैसाही घेतला नाही. मी आतापर्यंत माझ्या आयुष्यात फक्त संघर्ष केला आहे, पण माझ्या आईने मला नेहमीच साथ दिली.”
” माझा मोठा भाऊ शेती करतो आणि त्यावरच आमच्या कुटुंबाचा सर्व खर्च चालतो. आमच्या घरात पैशांची एव्हढी समस्या होती की, मी खेळायचं तर सोडाच शिक्षणही करू शकत नव्हते. सुकांत सरांना माझ्या कुटुंबाच्या परिस्थितीची जाणीव असल्याने ते कित्येक वर्षांपासून महिन्याला ४००० हजार रुपये द्यायचे. त्यांनी फक्त एकदाच मला क्रिकेट खेळताना पहिले होते, तरीही ते प्रशिक्षकांच्या बोलण्यावरून मला मदत करायला लागले. मला जेव्हा जेव्हा कशाचीही गरज पडली तेव्हा संजय कपूर सरांनी मदत केली. या लोकांची मदत नसती तर कदाचित मी आज इथपर्यंत पोहोचू शकले नसते.”
कुलदीप यादवसोबत अर्चना गोलंदाजीचा सराव करायची
अर्चना भारतीय क्रिकेटपटू कुलदीप यादवचे प्रशिक्षक कपिल देव पांडे यांच्या प्रशिक्षणात सराव करते. कुलदीपही तेथे सरावासाठी येत असतो. अर्चना म्हणाली की, “कुलदीप भैय्याकडूनही खूप काही शिकण्यासारखे मिळाले. तो इतका मोठा खेळाडू आहे पण नेहमी शांत राहतो आणि त्याच्या खेळावर लक्ष केंद्रित करतो. तो म्हणत असे की, जेव्हा जेव्हा फलंदाज आक्रमकपणे खेळतो तेव्हा तुम्ही तुमच्या गोलंदाजीमध्ये विविधता आणली पाहिजे. मला आनंद आहे की आजपर्यंत मला कोणीही ओळखत नव्हते, पण माझी संघात निवड झाल्यापासून सगळे संवाद साधत आहेत.”