पुणे, दि. 9 -देशात 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीबरोबरच एकत्रित विधानसभा निवडणुका घेण्याची केंद्रीय निवडणूक आयोगाची तयारी आहे. मात्र, हा धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार केंद्र सरकारचा असल्याचे केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले.
विधानभवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये कुमार यांनी सांगितले. यावेळी निवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे, निवडणुक आयोगाचे विशेष अधिकारी डॉ. रणबीर सिंग, निवडणूक उपायुक्त हिरदेश कुमार, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, निवडणुक आयोगाच्या माध्यम व संवाद महासंचालक शेफाली शरण आदी उपस्थित होत्या.
यावेळी “वन नेशन आणि वन इलेक्शन’ अशी चर्चा होत आहे. 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी विधानसभा निवडणुका घेणे शक्य आहे का, असे विचारले असता राजीव कुमार यांनी सांगितले की, 2024 मध्ये होणाऱ्या विधानसभा, लोकसभा निवडणुका या एकत्रित घेणे आयोगाच्या दृष्टीने शक्य आहे. त्याबाबत साधनसामग्रीसह आमची सज्जता आहे. मात्र, हा धोरणात्मक निर्णय आहे. हा विषय आमच्या अखत्यारित येत नाही. त्यावर केंद्र सरकारने निर्णय घेणे अपेक्षित आहे.आगामी निवडणुकांमध्ये मतदानाचा हक्क बजावण्यासाठी प्रत्येक घटकाला सामावून घेण्याचा आयोगाचा प्रयत्न आहे. तरुणांपासून तृतीयपंथांनाही यात सामावून घेण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे मतदार यादी, मतदान प्रक्रिया या दोन्ही पारदर्शक आणि सर्वसमावेश करण्याचा मानस आहे. मतदानाच्या दिवशी औद्योगिक कंपन्यांना सुट्टी जाहीर केली जाते. मात्र, मतदार त्या सुट्टीचा आनंद घेत मतदानाकडे पाठ फिरवितात. त्यामुळे उद्योजक, विद्यापीठे, विविध स्वयंसेवी संस्था, संघटनांशी आम्ही संवाद साधत असून त्यांच्यात मतदान प्रक्रियेबाबत जनजागृती करत असल्याचे राजीव कुमार यांनी सांगितले.
…त्यांनाही वाहतूक कोंडीचा फटका
पुणे शहरातील वाहतूक कोंडीचा फटका देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त यांना बुधवारी बसला. विधानभवन येथे राजीव कुमार यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन सायंकाळी सव्वापाच वाजता केले होते. मात्र, त्यांना येथे पोहोचण्यास 35 मिनिटे उशीर झाला. नियोजित वेळ उलटून गेल्याने पत्रकारांनी संबंधितांकडे विचारणा करता वाहतूक कोंडीत अधिकारी अडकल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर आयोगाचे अधिकारी पत्रकार परिषद सुरू करण्यापूर्वी त्यांनी वाहतूक कोंडीमुळे येण्यास उशीर झाल्याचे सांगितले.