प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 12 -स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेळेत व्हाव्यात, यासाठी पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचा अध्यक्ष या नात्याने मी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आज सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका दाखल करून घेतली आहे. येत्या काही दिवसांत याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता असल्याची माहिती राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली.
पंचायत राज व्यवस्थेतील महापालिका, नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत या संस्थांमधील निवडणुका कुठल्याही परिस्थितीमध्ये पुढे ढकलण्यात येऊ नये. तसेच ही सभागृहे सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ रिक्त ठेवू नये, अशी 73 वी घटना दुरुस्ती आहे. मात्र, शासनाने या कायद्याचे उल्लंघन केले आहे.
याशिवाय बदललेली चार सदस्य प्रभाग रचना लागू केल्यास पुन्हा निवडणुकीची संपूर्ण तयारी, प्रभाग रचना, हरकती-सुनावण्या मतदारयाद्या, आरक्षण सोडत या सर्व गोष्टींसाठी वेळ लागणार आहे. राज्यातील 13 कोटी जनतेपैकी तब्बल 9 कोटी जनतेला या एका बदलाचा फटका बसणार आहे. महाविकास आघाडी सरकारने केलेल्या त्रिसदस्य प्रभाग रचना पद्धतीमध्ये पुणेकरांना 173 नगरसेवक मिळणार होते; परंतु हा नव्या निर्णयामुळे सात नगरसेवक कमी करण्यात आले आहेत. या मुद्यांचा याचिकेत आधार घेतल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले.