Ramdas Kadam on Anil Parab – डॉलरच्या तुलनेत रुपयाने आजवरचा तळ गाठला आहे. रुपयाच्या अवमूल्यनाशी अथवा ‘पडण्या’शी जर देशात कोणी स्पर्धा करत असेल तर ते महाराष्ट्रातील सत्ताधारी व विरोधी पक्षाचे नेते आहेत असं म्हंटल्यास वावगे ठरणार नाही. मागील २-३ वर्षातील राज्याच्या राजकारणात सक्रिय असलेल्या नेत्यांची वक्तव्ये तपासल्यास महाराष्ट्राचा सुसंस्कृत असा लौकिक धुळीस मिळवण्याचे काम त्यांनी नित्याने केल्याचं आढळेल. राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी सोमवारी महिला खासदाराला शिवीगाळ करत राजकारणाचा स्तर आणखी खाली पाडण्याची कामगिरी बजावली होती. सत्तारांनंतर आज राममदास कदम मैदानात उतरले आहेत. कदम यांनी, त्यांच्याच पूर्वाश्रमीच्या सहकाऱ्यांना शिव्यांची ‘ऑन कॅमेरा’ लाखोळी वाहत राजकीय नेत्यांमध्ये सुरु असलेल्या शिव्यांच्या स्पर्धेत खंड पडू दिला नाही.
काय म्हणाले रामदास कदम? | Ramdas Kadam on Anil Parab
“अनिल परब यांना लवकरात लवकर तुरुंगात टाकायला पाहिजे. त्यांना आत टाकण्यात एवढा उशीर का होत आहे? हेच मला कळत नाही. माझ्या मुलावर सगळ्यात जास्त अन्याय अनिल परबांनी केलाय. दापोली आणि मंडणगडची नगरपरिषद शिवसेनेच्या ताब्यात होती. पण अनिल परबांनी माझा मुलगा योगेश कदम यांना बाजुला ठेऊन, या नगरपरिषदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या घशात घालण्याचं काम केलं.
अनिल परबांनी शिवसेना संपवण्याची सुपारीच घेतलीय. उद्धव ठाकरेंना अशीच *$#$% माणसं आजुबाजूला लागतात… असं म्हणत रामदास कदमांनी शिवराळ भाषेचा वापर केला आहे.
यावेळी त्यांनी अनिल परब यांच्यासह सुभाष देसाई आणि विनायक राऊतांचाही अर्वाच्च भाषेत उल्लेख केला. सुभाष देसाई हा कान चावणारा आणि कानात बोलणारा माणूस आहे. जोपर्यंत हे नेते उद्धव ठाकरेंच्या आजुबाजूला आहेत, तोपर्यंत त्या पक्षाचं काहीही खरं नाही, असंही रामदास कदम म्हणाले.