पुणे, दि. 22 -महापालिकेकडून लवकरच शहरातील तब्बल 400 किलोमीटरचे रस्ते मुळासकट दुरुस्त केले जाणार आहेत. यंदाच्या पावसाळ्यापूर्वी शहरात महापालिकेच्या जलवाहिन्या, ड्रेनेजची कामे, खासगी केबलची खोदाई, तसेच महावितरणच्या खोदाईनंतर दुरुस्त करण्यात आलेले रस्ते तकलादू पद्धतीने दुरुस्त केल्याने पावसाळ्यात पुणेकरांना मनस्ताप सहन करावा लागला होता. त्यामुळे ही कामे झालेले रस्ते पुन्हा एकसारखे करण्यासाठी ते मुळापासून खोदून पूर्णत: नव्याने केले जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात 115 किलोमीटरचे काम केले जाणार आहे. त्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे.
अशी होणार दुरुस्ती
अनेक डांबरी रस्त्यांची खोदाईनंतर कॉंक्रिटने दुरुस्ती करण्यात आली आहे. परिणामी, हे रस्ते खाली-वर झाले आहेत. याशिवाय, डांबर आणि कॉंक्रिट एकत्र न झाल्याने रस्त्यावर चिरा निर्माण होऊन खड्डे पडले आहेत. तर काही भागात खोदाईनंतर जमीन सपाट करताना केवळ माती आणि दगड, राडारोडा टाकण्यात आल्याने या दुरुस्त केलेल्या रस्त्यावरून वाहने गेल्यास हा भागच खचला असून, त्यात पुन्हा पावसाने खड्डे पडले आहेत. त्यामुळे हा दुरुस्त केलेल्या भागासह खराब झालेल्या रस्त्याचा सगळा भागच खोदला जाणार आहे.
याशिवाय त्याच्या आसपासचा सगळा रस्ता खोदून शास्त्रोक्त पद्धतीने त्यावर भराव टाकला जाणार असून, नंतर सिमेंट रस्ता असल्यास सिमेंट तर डांबरी रस्ता असल्यास डांबरी रस्ता नव्याने विकसित केला जाणार आहे. हे काम करताना संबंधित रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवली जाणार आहे. त्यामुळे भविष्यात हे रस्ते पुन्हा उखडणार नसल्याचे पथ विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.
खड्ड्यांनी झाली पंचाईत
यंदाच्या वर्षी शहरात महापालिकेकडून समान पाणी योजनेसाठी पावसाळ्यातही खोदाईस परवानगी दिली होती. त्यातच यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. त्यामुळे आधीच तकलादू पद्धतीने महापालिकेकडून अशास्त्रीय, तसेच जमेल तसे रस्ते दुरुस्त केल्याने पावसाळ्यात शहरात जंगली महाराज रस्ता वगळता एकही रस्ता खड्डेमुक्त नव्हता. त्यामुळे महापालिका प्रशासनास यंदा पुणेकरांच्या टीकेचे धनी व्हावे लागले. ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्यासह त्यांच्याकडून लाखोंचा दंड वसूल करून त्यांच्याकडून रस्ते दुरुस्तीही करून घ्यावी लागली. त्यामुळे यंदा पाऊस आणि खड्ड्यांनी महापालिकेची पंचाईत केल्याचे दिसून आले.