पुणे, दि. 21 -महापालिकेने गेल्या पाच वर्षांमध्ये शहरात नालेसफाई, ड्रेनिजची कामे, सांडपाण्याचे नियोजन एकूणच पावसाळी पुरस्थितीचे नियंत्रणासाठी काय उपाययोजना केल्या, असा ठपका ठेवत या बाबतीत पालिकेने श्वेतपत्रिका जाहीर करावी, अशी मागणी कॉंग्रेसने केली आहे.
शहरामध्ये गेल्या महिन्याभरात झालेल्या पावसामुळे शहरातील अनेक भागात पाणी साचण्याचे प्रमाण वाढले असून चार दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने तर संपूर्ण पुणे शहर व उपनगरामध्ये रस्त्याला नदीचे स्वरूप आले होते. यामुळे शहर व उपनगरामधील अनेक सोसायट्या मध्यवस्ती भाग व झोपडपट्ट्यांमध्ये पाणी शिरले, वाहतुकीच्या कोंडी बरोबरच रस्त्यांच्या खड्ड्यांमुळे पुणेकरांना त्रास सहन करावा लागला त्यानंतर पुणेकर नागरिकांनी याबाबत पालिका प्रशासन तसेच सत्ताधारी, विरोधक एकूणच राजकीय नेत्यांवर मोठी टीका केली. परंतु, या सर्व परिस्थितीला सर्वस्वी महापालिका प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप शहर कॉंग्रेसने केला आहे.
याबाबतचे निवेदन पक्षाच्या वतीने आयुक्त विक्रम कुमार यांना देण्यात आले आहे. शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे, माजी आमदार रमेश बागवे, ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार, गोपाळ तिवारी, माजी नगरसेविका लता राजगुरू यांच्यासह कॉंग्रेसचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
कामांकडे दुर्लक्ष व टक्केवारीकडे लक्ष
भाजपाने प्रशासनावर दबाव टाकून गेल्या 5 वर्षांमध्ये केवळ ठेकेदारांच्या हिताचे निर्णय घेतले व काम न करताच प्रशासनाने साथ देऊन बिले काढण्याचे प्रकार महापालिकेत झाले. वर्षांमध्ये नाले सफाई, ड्रेनिजची कामे, सांडपाण्याचे नियोजन या बाबतीत प्रशासनाचे कामांकडे दुर्लक्ष व सत्ताधारी भाजपचे टक्केवारीकडे लक्ष यामुळेच मिळकत कर भरणाऱ्या पुणेकरांना जीव मुठीत घेऊन व जीव धोक्यात घालून पुण्यामध्ये वास्तव्य करावे लागत असल्याने तातडीने याबाबत चौकशी करून कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.