पिंपरी, दि. 4 (प्रतिनिधी) – महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या अप्रगत मुलांची गुणवत्ता वाढविण्यासाठी शिक्षण विभागाकडून नवीन उपक्रम हाती घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांचे प्राथमिक मूल्यमापन तपासून निपुण भारत कार्यक्रम आणि सेतू उपक्रमांतर्गत विषयनिहाय शिक्षण देऊन त्यांना प्रगत मुलांच्या प्रवाहात आणण्यात येणार आहे. त्यामुळे अप्रगत विद्यार्थांची गुणवत्ता वाढविण्यासाठी मदत होणार आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 108 प्राथमिक शाळेत विविध वर्गांच्या वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये सुमारे 36 हजार विद्यार्थी शिकत आहेत. इयत्ता पहिली ते नववी शालेय स्तरावर होणाऱ्या परीक्षा कालबाह्य झाल्या आहेत. त्यातच दोन वर्षांत कोविड विषाणू संक्रमणाचा फटका बसल्याने विद्यार्थ्यांचे शिक्षण पुस्तकातून थेट मोबाइलमध्ये आले. सलग दोन वर्षे घरात बसून ऑनलाइन शिक्षण घेण्याची सुविधा मिळाली असली तरी प्रात्यक्षिक स्वरुपात मिळणाऱ्या शिक्षणाने विद्यार्थ्यांमध्ये होणारा नैतिक बदल खुंटला गेला. असंख्य विद्यार्थी मोबाइल हातात आल्यानंतर शैक्षणिक गांभीर्य विसरून गेले. परिणामी, विद्यार्थी अभ्यासापासून वंचित झाल्याने अप्रगत विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली. ही संख्या कमी करण्यासाठी महापालिकेच्या शाळेत निपुण भारत कार्यक्रम आणि सेतू उपक्रम राबविण्यात येणार आहेत. याद्वारे अप्रगत विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणले जाणार आहे.
प्राथमिक मूल्यांकनानुसार विद्यार्थ्यांची निवड
निपुन भारत कार्यक्रम आणि सेतू उपक्रमांतर्गत मनपा शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासून अप्रगत विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांचे प्राथमिक मूल्यांकन तपासण्यात येणार आहे. यात अप्रगत विद्यार्थ्यांचे गट तयार करून त्यांचे जादा तास घेतले जाणार आहेत. इंग्रजी, गणित, हिंदी, मराठी, विज्ञान असे विषयनिहाय विद्यार्थ्यांना जादा तासात शिकवले जाणार आहे. त्यासाठी पालिकेच्या शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यावर भर
विद्यार्थ्यांच्या मानसिक तयारीचा विचार करून 40 दिवसांचा कार्यक्रम आखण्यात येणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांचे पालक, शिक्षण समित्या प्रतिनिधी, वर्गातील हुशार विद्यार्थी, शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना सामावून घेऊन पुढील कार्यवाही निश्चित केली जाणार आहे. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच त्यांचा सर्वांगीण विकास साधण्यावर देखील भर दिला जाणार आहे.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मूल्यमापन करून अप्रगत विद्यार्थ्यांचे गट तयार केले जातील. विद्यार्थी ज्या विषयात अप्रगत आहे, तो विषय त्याला समजेल अशा स्वरुपात शिकविला जाईल. जादा तास घेऊन विषयनिहाय शिकविण्याचे नियोजन केले आहे. प्रत्येक वर्गातील अप्रगत विद्यार्थ्यांना प्रगत विद्यार्थ्यांच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. – संजय नाईकडे, प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग.