पुणे, दि. 2 (व्यंकटेश भोळा) – जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्राबल्य आहे. हे तगडे आव्हान असतानाही भाजपने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या दौऱ्याच्या माध्यमातून बारामती मतदारसंघ पिंजून काढला. त्यानंतर आता पुण्याच्या पालकमंत्रीपदाची सूत्रे हाती घेताच चंद्रकांत पाटील यांनी भाजपच्या तालुकानिहाय बैठका घेणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने जिल्ह्यात भाजपने पाळेमुळे घट्ट करण्याच्या दिशेने उचललेले पाऊल म्हणावे लागेल.
पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी जिल्ह्यातील भाजपच्या प्रमुख नेत्यांची पहिली बैठक शनिवारी (दि.1) पुण्यात घेतली. पुणे जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत. या निवडणुकीत जिल्हा परिषदेसह जिल्ह्यातील अधिकाधिक पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतीवर भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व कसे राहील, त्यादृष्टीने आतापासून या निवडणुकीसाठी कामाला लागा, असा आदेश पाटील यांनी या बैठकीत भाजपच्या नेत्यांना दिला आहे. त्यामुळे आता जिल्ह्यात निवडणुकांमध्ये भाजप सर्व तयारीशी उतरणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
तीन महिन्यांपूर्वी भाजपाने राज्यात “मिशन 45′ ही मोहीम राबवित मोर्चेबांधणी, पक्षसंघटनेला बळ दिले आहे. यात बारामती, मावळ लोकसभा मतदारसंघाचाही समावेश आहे. लोकसभा निवडणूक दीड वर्षांवर असताना भाजपचे दिल्लीतील नेतृत्वाने लक्ष केंद्रीत केले आहे. केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांचा दौरा हा पदाधिकारी, कार्यकर्त्यांना उभारी देणारा ठरला का? त्यातच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे आल्याने जिल्ह्यातील भाजपच्या निष्ठावंत पदाधिकाऱ्यांना बळ मिळणार का? अशा राजकीय चर्चा रंगल्या आहेत.
पालकमंत्री पाटील यांच्याकडून जिल्हा नियोजन समितीत पक्षाच्या निष्ठावंत पदाधिकाऱ्यांना संधी देत त्यांच्या माध्यमातून व्यापक रणनीती आखली जाणार आहे. त्याचे सकारात्मक परिणाम भाजपला मिळू शकतात. जिल्हा नियोजन समितीत पदाधिकाऱ्यांना संधी मिळाल्यास भाजपला गावपातळीपर्यंत पाळेमुळे रूजवता येणार आहेत.
निर्मला सीतारामन आणि रेणुकासिंह या मंत्र्यांनी अनुक्रमे बारामती आणि शिरूर लोकसभा मतदारसंघांचा दौरा केला. यात त्यांनी केंद्रीय योजनांची माहिती देत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढविण्याचा प्रयत्न केला. पालकमंत्र्यांनी सर्व तालुक्यांत लक्ष घालणार असल्याचे म्हटल्याने निवडणुकांसाठी मोर्चेबांधणीला वेग आला आहे.
अजित पवारांनी फोडली निवडणुकांतील यशाची गुपिते…
भाजपने जिल्ह्यात रणनिती आखण्यास सुरुवात केली असताना राज्याचे विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी बारामती मतदारसंघात सातवेळा कसा निवडून कसा आलो, या सातत्यपूर्ण यशाचे गुपित नुकतेच उस्मानाबाद येथे जाहीर केले. “कोणतीही संस्था चालवताना हा जवळचा, हा लांबचा असा भेदभाव कधीच करीत नाही. हा आपल्या पक्षाचा म्हणून त्याचा ऊस आधी आणायचा, विरोधकाचा म्हणून त्याचा ऊस उशिरा हा भेदभाव माझ्या तरी भागात मी करीत नाही. निवडणुकीत माझ्या विरोधात काम केले तरी त्यांची कामे करतो,’ असे पवारांनी स्पष्ट केले. या कार्यपद्धतीमुळेच जिल्ह्यात दूध सहकारी संस्था, पुणे जिल्हा सहकारी बॅंकसह अनेक सहकारी संस्थांवर राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला निवडणुकीत जोरदार यश मिळत आहे. जिल्ह्यात शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अजित पवारांचे नेहमीच बारकाईने लक्ष असते. अशा प्रस्थापित नेत्यांपुढे भाजपची निवडणुकीची रणनिती कितपत यशस्वी ठरेल, याची चर्चा आता रंगली आहे.