सध्या सणासुदीचे दिवस आहेत, होय ना मुलांनो? गणपतीचे कोडकौतुक करून आपण गणेशोत्सव साजरा केला आणि अनंत चतुर्दशीला आपण गणपतीचे विसर्जन केले. आता सोमवारी घटस्थापना केली आणि मग बुधवारी विजयादशमी. दसरा.
या नऊदहा दिवसांत श्रीमहाकाली, श्रीमहालक्ष्मी व श्रीमहासरस्वती या तीन देवींची म्हणजेच त्रिशक्तींची उपासना, पूजा केली जाते. या त्रिशक्तींची चंडिका, भद्रा, दुर्गा, भगवती, त्रिपुरा, भुवनेश्वरी, भैरवी, श्यामा, ललिता अशी अनेक रूपे आहेत.
बंगाली लोकांमध्ये दुर्गा, कालिमाता या देवतांची विशेषकरून पूजा केली जाते. आपल्याकडे जसा दीपावली हा वर्षातला मोठा सण मानला जातो, तसा त्यांच्याकडे नवरात्रोत्सव हा उत्सव मानतात. सारेजण या उत्सवात उत्साहाने भाग घेतात.
महाराष्ट्रातही श्रीदुर्गा, शांतादुर्गा, तुळजाभवानी, अंबाबाई अशी देवींची पुष्कळ देवालये आहेत व बऱ्याच कुटुंबांची ही कुलदेवता असते. शिवाजी महाराजांची तुळजाभवानी ही कुलदेवता होती. कोकणात शांतादुर्गा किंवा सातेरी या देवीचे देवालय अनेक गावांत आढळून येते.
या त्रिशक्तींविषयी पुराणातून असं सांगितलं आहे की, श्री महाकाली ही तमोगुणी म्हणजे उग्र देवी आहे. हिला महिषासुरमर्दिनी असंही म्हटलं जातं.
आपल्या देवीच्या आरतीत महिषासुरमर्दिनीला आळवलं आहे. मोठं युद्ध करून महिषासुर या दैत्याचा तिनं निःपात केला म्हणून तिला महिषासुरमर्दिनी असं नाव पडलं आहे. सरस्वती ही देवी सत्त्वगुणी म्हणजे शांत देवी आहे. या नऊ दिवसांना “शारदीय नवरात्र’ असंही म्हटलं जातं. शारदा, सरस्वती या विद्येच्या देवता. आणि म्हणून आपण दसऱ्याच्या दिवशी तिचं स्मरण करतो. पाटीपूजन केलं जातं. ज्ञान देणारी पुस्तकं, वह्या ह्यांची आपण पूजा करतो.
अष्टमी आणि नवमी या तिथींना महातिथी म्हटलं जातं. या दिवसांचं पूजेच्या दृष्टीनं विशेष महत्त्व असतं. त्या दिवशी उपास केला जातो. स्त्रियांच्या रूपात देवीला पाहून त्यांना मुद्दाम जेवायला बोलावलं जातं. या नऊ दिवसांत ज्या दिवशी पंचमी असते, तिला ललितापंचमी असं म्हटलं जातं. त्या दिवशी लहान मुलींना बोलावून त्यांना देवीचं रूप मानून पूजा, नैवेद्य केला जातो.
देव आणि दानव म्हणजे सुष्ट आणि दुष्ट यांच्यामधे पूर्वीपासून लढाई चालत आलेली आहे. अशाच एका देव-दानवांच्या युद्धात सर्व देवांचा पराभव होतो. देवांचा राजा इंद्र यालाही इंद्रलोकातून हाकलून लावले गेले व महिषासुराने स्वतःच इंद्राचे पद धारण केले. तेव्हा सारे देव ब्रह्मदेवाला पुढारी करून शंकर व विष्णूकडे गेले. देव त्यांना म्हणाले, “आता स्वस्थ बसून चालणार नाही. सूर्य, इंद्र, अग्नी, वायू, चंद्र, यम, वरुण वगैरे सर्व देवांचे अधिकार हे असुर बळकावू लागले आहेत. या राक्षसांचा वध करण्यासाठी काहीतरी मार्ग काढा.
त्यांचं हे बोलणं ऐकून शंकर व विष्णू विचारात पडले. तेवढ्यात तिथे प्रचंड मोठा तेजोगोल प्रकट झाला व त्यातून एका स्त्रीने अवतार घेतला. ही देवी म्हणजेच त्रिशक्ती. सप्तशती नावाच्या प्राचीन ग्रंथात राक्षस व त्यांचे सैन्य आणि या देवी व त्यांचे हत्ती, सिंह यांच्यासह असलेले प्रचंड सैन्य यांच्या युद्धाचे फार चित्तथरारक वर्णन केले आहे. परस्परांनी सोडलेल्या अनेक प्रकारच्या शस्त्रास्त्रांनी सर्व दिशा व अंतरीक्ष प्रदेश चमकू लागला.
देवींकडची तलवार, धनुष्य, शूल, चक्र, शक्ती, वज्र अशी एकापेक्षा एक मोठमोठी शस्त्रे यांचं त्यात वर्णन आहे. देवतांचे तेज, त्यांचा आवाज यांमुळे सर्व आकाश भरून गेले. समुद्र खवळला, पृथ्वी कंपित झाली आणि तिच्यावरचे पर्वतही डळमळू लागले. देवींच्या नुसत्या सुस्काऱ्यांनी वादळे होऊ लागली.
नऊ दिवस नऊ रात्री हे युद्ध चालले व अखेरीस सर्व असुरांचा नायनाट झाला. हे पाहिल्यावर देवांना अतिशय आनंद झाला व त्यांनी देवीची स्तुती केली. अशा प्रकारे महिषासुरमर्दिनीने महिषासुरास ठार केले. मधु आणि कैटभ या दैत्यांना श्रीमहाकालीने पराभूत केले व श्रीमहासरस्वती हिने शुंभ व निशुंभ या दोन दैत्यांचा अंत केला. तेव्हा सर्व देवांनी या त्रिशक्तींवर पुष्पवृष्टी करून त्यांचे स्तवन केले.
सामान्यतः देव-दानवांच्या युद्धात असं दिसून येतं की, देव हे सुसंस्कृत असल्यामुळे ते सत्वगुणप्रधान आहेत.
आडदांड, क्रूर दानवांप्रमाणे एकदम आक्रमक होऊन हिंसा करणे त्यांना अवघड वाटते. पण याचा परिणाम असा होतो की, आपल्या पाशवी शक्तीच्या जोरावर हे क्रूर व अविचारी दानव सारे नीतिनियम बाजूला ठेवून देवांवर अत्याचार करू पाहतात. देवांची संस्कृतीच नष्ट होण्याची वेळ येते. अशा वेळी आदिशक्ती प्रकट होऊन अनेक रूपे धारण करते व दुष्टांचे निर्दालन करते. म्हणून नवरात्रीच्या निमित्ताने या शक्तिदेवतांचे स्मरण करून अन्याय, वाईट प्रवृत्ती नष्ट होवोत अशी प्रार्थना करू यात. स्त्रीशक्तीचा आदर करू यात.
– माधुरी तळवलकर