कान्हे, दि. 17 (वार्ताहर) – पुणे-मुंबई लोहमार्गावर कान्हे येथे रेल्वे उड्डाणपूल नसल्यामुळे कान्हे रेल्वे गेट जवळ दोन ते तीन किलोमीटर लांबच्या लांब वाहनांच्या रांगा लागत आहेत. त्यामुळे कामगार वर्ग व उद्योजकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कामगारांना कामावर येताना होणारा विलंब व ये-जा करण्यात खर्ची पडणाऱ्या वेळेमुळे या भागातील अनेक उद्योगांनी स्थलांतर केले आहे. नागरिक व लोकप्रतिनिधींकडून वारंवार मागणी व पाठपुरावाकरूनही कान्हे येथील उड्डाणपूल लालफितीत अडकल्याचे वास्तव आहे.
कान्हे-टाकवे येथे मोठ्या प्रमाणात औद्योगिक कंपन्या असल्याने येथे मोठ्या प्रमाणात कामगारवर्ग ये- जा करत असतो. याठिकाणचे रेल्वे गेट अनेकदा बंद असते. त्यामुळे अंदर मावळ मधील 30 ते 40 गावांना 70 ते 60 किलोमीटरचा वळसा घालून जावे लागते. या सर्व अडचणी लक्षात घेऊन कान्हे येथे उड्डाणपूलाची नितांत गरज आहे.
आंदर मावळमधील धबधबे व निसर्ग व पर्यटनस्थळांचे पर्यटकांना नेहमीच आकर्षण राहिले आहे. पावसाळ्यात आंदर मावळात मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. ही संख्या शनिवारी रविवारी हजारोंवर जाते. मात्र वारंवार रेल्वे गेट बंद असल्याने येणाऱ्या पर्यटकांचा हिरमोड झाल्याचे दिसून येते. त्यामुळे आता आंदर मावळात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येवर परिणाम होऊ लागला असल्याचे चित्र आहे. त्यामुळे स्थानिक पर्यटन व्यवसायावरदेखील याचा देखील परिणाम झाल्याचे दिसते. तसेच कंपनीसाठी ट्रान्सपोर्ट करणाऱ्या गाड्या वेळेअभावी न पोहचल्यामुळे कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे अनेक लहान-मोठ्या उद्योगांनी येथून आपला गाशा गुंडाळला आहे.
कान्हे येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असल्याने तेथे येणाऱ्या रूग्णांनादेखील त्याठिकाणी पोहचण्यासाठी बराच वेळ वाट पहावी लागते. याशिवाय या भागातील दुग्ध व्यावसायिक व कामगार यांनाही रेल्वे गेटमुळे अडचण होते. जांभूळ येथील रेल्वेगेट बंद असल्याने तेथील अंडरपासचे काम चालू असल्यामुळे तेथील नागरिकांना कान्हे फाटा येथूनच पर्यायी मार्ग उपलब्ध आहे. कान्हे टाकवे औद्योगीकरण पाहता कान्हे रेल्वे उड्डाणपूल होणे आवश्यक आहे. त्याकरिता आता वेळोवेळी दिलेल्या निवेदनांवर कोणतीही कार्यवाही झाले नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे ग्रामस्थ निराश झाले आहेत.
कान्हे येथे उड्डाणपूल नसल्याने या भागातील कंपन्यांना मोठा फटका बसत आहे. तर व्यावसायिक, नोकरदार, पर्यटक व रूग्णदेखील त्यामुळे कमालीचे हैराण झाले आहेत. उड्डाणपुलाच्या उभारणीसाठी लोकप्रतिनिधींनी केलेल्या प्रयत्नांना यश आलेले नाही. त्यामुळे आता नागरिकांनीच रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे.
– सागर गायकवाड, ग्रामस्थ