पंढरपूर – महाराष्ट्रातील प्रमुख देवस्थान श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा सात मजली दर्शन मंडप पाडण्यात येणार आहे. त्या ठिकाणी तिरूपती बालाजीच्या धर्तीवर विठ्ठल-रुक्मिणीच्या पदस्पर्श दर्शन रांगेची व्यवस्था करण्यात येणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकाऱ्यांचे एक शिष्टमंडळ बालाजी देवस्थानची आणि तेथील दर्शनरांगेची पाहणी करण्यासाठी गेले आहे. तेथील आढावा घेऊन त्या धर्तीवर पंढरपुरातील सात मजली दर्शनरांग मंडपाच्या जागी सर्व सोयी सुविधायुक्त दर्शनरांगेचे नियोजन करण्यात येणार आहे. पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात तशी शिफारस करण्यात आली आहे. आगामी काळात येथे पार्किंग व कार्यालय उभारण्यात येणार असल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झालेली आहे.
दरम्यान, पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे राज्यातील प्रमुख देवस्थान मानले जाते. राज्यासह देश-विदेशातून भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी येत असतात. दररोज हजारो भाविक दर्शनासाठी रांगेत उभे असतात. पंढरपुरातील आषाढी, कार्तिकी, माघ, आणि चैत्र वारीला लाखो वारकरी दर्शनासाठी येतात. अशावेळी सध्याची दर्शनमंडप व्यवस्था अपुरी असल्याने भाविकांच्या सोयीसाठी नवीन दर्शनरांग तयार करण्यात येणार आहे.