कोलकता – पश्चिम बंगालमधील तृणमूल कॉंग्रेस सरकारला भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून घेरण्यासाठी भाजपने मंगळवारी निषेध मोर्चा काढला. त्या मोर्चावेळी कोलकत्यासह विविध ठिकाणी कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये संघर्ष होऊन अनेक जण जखमी झाले. त्यामुळे बंगालमधील वातावरण तापल्याचे चित्र दिवसभर होते.
कोलकत्यातील राज्य सचिवालयावर मोर्चा नेण्याचे भाजपने ठरवले. त्यासाठी बंगालच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने भाजपचे कार्यकर्ते दाखल झाले. कोलकत्यात पोहचण्याआधी काही ठिकाणी कार्यकर्ते आणि पोलीस आमनेसामने आले. मोर्चाला सचिवालयापर्यंत जाण्यापासून रोखण्यासाठी पोलिसांनी विविध मार्गांवर बॅरिकेडस् उभारले होते.
ते पाहून मोर्चात सहभागी झालेले कार्यकर्ते आक्रमक बनले. त्यांनी पोलिसांवर दगडफेक सुरू केली. कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी पाण्याचे फवारे मारले. अश्रुधुराचा मारा आणि लाठीमारही केला. त्या राड्यावेळी काही वाहनांची जाळपोळही करण्यात आली.
मोर्चात सहभागी झालेल्या भाजपच्या अनेक प्रमुख नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामध्ये बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांचाही समावेश होता. निदर्शने करण्याचा विरोधकांचा लोकशाही अधिकार हिरावण्यात आल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला.
तर, मोर्चावेळी झालेल्या राड्यावरून सत्तारूढ तृणमूलने भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले. गोंधळ करून राज्यातील शांतता बिघडवण्याचा प्रयत्न भाजपने केला. त्या पक्षाची कृती संपूर्ण देशाची अप्रतिष्ठा करणारी आहे, अशी प्रतिक्रिया तृणमूलकडून देण्यात आली. दरम्यान, मोर्चाने वातावरण तप्त बनल्याने कोलकत्यातील जनजीवन विस्कळीत झाले. त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले.