नगर – स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत “घरोघरी तिरंगा’ उपक्रम मोठ्या उत्साहाने साजरा करण्यासाठी जिल्ह्यातील नागरीकांनी स्वयंप्रेरणेने तिरंगा ध्वज आपल्या घरावर फडकवावा, यासाठी नागरीकांना प्रशासनाच्या वतीने सक्ती न करता आपल्या घरावर तिरंगा लावण्यासाठी प्रोत्साहित करावे, अशा सूचना मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या. मुंबई येथुन दूरदृष्य प्रणालीद्वारे प्रशासनातील अधिकाऱ्यांशी संवाद साधतांना मंत्री विखे पाटील बोलत होते.
जिल्हाधिकारी कार्यालयात “घरोघरी तिरंगा’ उपक्रम पूर्वतयारी आणि नियोजन या संदर्भात दूरदृशष्य प्रणालीद्वारे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी उपस्थित होते. हा उपक्रम सर्वांच्या सहकार्यानेच यशस्वी होईल अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.